कराड : भाजपने जनतेला दाखवलेली विकासाची स्वप्ने भंग पावली आहेत. विकासाचे सर्व मुद्दे फोल ठरल्याने सेना-भाजपला पुन्हा राम आठवत आहे. परंतु, रामाच्या नावावर पुन्हा मते मिळणार नाहीत, असे ठाम मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे त्यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार विश्वजित कदम, आमदार आनंदरराव पाटील, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, शहराध्यक्ष आप्पा माने, अशोकराव पाटील, सुनील पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचे काम केले आहे. त्यांच्या विचारांची जोपासणी करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार आहे. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावरही भाष्य केलं. चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले तर आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत. या आरक्षणाचे सर्व श्रेय मुख्यमंत्री फडणवीस यांना मिळाले तरी हरकत नाही. पण, आरक्षणासाठी मराठा समाजाची फसवणूक करु नका. अन्यथा उद्रेक होईल, असे चव्हाण यांनी म्हंटले आहे.