मुंबई (सुनील तर्फे)। निवडणूकीनंतर पुन्हा एकदा शिवसेना-भाजप भिडण्याच्या तयारीत आहेत. त्याला कारण आहे मुंबईचा विकास आराखडा. मुंबईच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखडयामध्ये असलेल्या त्रुटी आणि चूका यामुळे हा आराखडा दोन वर्षांनंतरही मंजूर झालेला नाही. मुंबईचा विकास आराखडा 19 मेपूर्वी महापालिका सभागृहात मंजूर करणे आवश्यक आहे. मात्र नगरसेवकांचा अभ्यास न झाल्याचे कारण पुढे करत त्याला आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या, अशी मागणी शिवसेना आणि काँग्रेसकडून केली जात आहे. विकासाच्या अजेंड्यावर निवडून आलेल्या भाजपाचा यास विरोध असल्याचे समजते. त्यामुळे मुदतवाढीच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजपा पुन्हा भिडण्याची शक्यता आहे.
दोन वर्षे रखडलेल्या आराखड्यासाठी 12 हजार सूचना व हरकती
वादग्रस्त शिफारशींमुळे मुख्यमंत्र्यांनी विकास आराखडा नव्याने बनवण्याचे निर्देश दिले होते. त्यानूसार आराखड्यातील चुका सुधारून पुन्हा नव्याने विकास आरखडा मंजूरीसाठी प्रशासनाला सादर करण्यात आला आहे. मात्र विकास आराखड्याबाबत 12 हजार सूचना व हरकती महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. महापालिकेच्या निवडणुकीनंतर नवनिर्वाचित नगरसेवकांना या आराखड्याचा अभ्यास करता आला नाही. त्यामुळे विकास आरखड्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आणखी दोन महिन्याची मुदत वाढ मागितली जाणार आहे. सभागृहातील संख्याबळ पाहता शिवसेना आणि भाजपा बरोबरीला असले तरी काँग्रेसनेही विरोध केल्यास बहुमताने मुदतवाढ मिळण्याची मागणी मंजूर होणार आहे.
याआधिही घेतली आहे मुदतवाढ
मुंबईचा सन 2014-2034 या 20 वर्षांचा विकास आराखड्याच्या मसुद्यामधील अनेक शिफारशींवर सर्वच स्तरांतून टिका झाली. याचे राजकीय पडसादही उमटले. यामध्ये परवडणारी घरे, आरे कॉलनीतील ना-विकास क्षेत्र खुले करणे, कोळीवाडे व गावठाणांची दखल न घेणे अशा काही शिफारशींचा समावेश होता. आताही अनेक ठिकाणी रहिवासी राहत असलेल्या जागेचे आरक्षण बदलण्यात आले आहे. धोबीघाटचे 7700 चौरस मिटर पेक्षा जास्त क्षेत्रफळ असताना विकास आराखड्यात 2 हजार चौरस मिटर इतकेच क्षेत्रफळ दाखवण्यात आले आहे. हे सर्व प्रकार मुंबईची जमीन बिल्डरांच्या घश्यात घालण्यासाठी सुरू असल्याने या आराखड्याला शिवसेना विरोध करणार आहे.नवीन नगरसेवकांना आराखड्याचा अभ्यास करण्यासाठी 19 मार्च पर्यंत दोन महिन्याची मुदतवाढ मागण्यात अली होती. 20 मार्च 2017 पर्यंत हा अहवाल मंजूर होऊन राज्य सरकारकडे पाठविण्याची अंतिम मुदत होती. मुदत वाढ मिळूनही अद्याप नगरसेवकांचा आराखड्यावरील अभ्यास झालेला नसल्याने आणखी दोन महिन्यांनी मुदत वाढवण्याची मागणी शिवसेना आणि काँग्रेसकडून राजकीय केली जाणार आहे. तसा प्रस्ताव महापालिका महासभेत आणला जाणार आहे.
शिवसेनेच्या नगरसेवकांना प्रशिक्षण
नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीत बरेच नगरसेवक नविन निवडून आले आहेत त्यांचा अभ्यास अजून झालेला नाही त्यांना पालिकेच्या विकास आराखड्याची माहिती व्हावी, यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांना शिवसेनेने विकास आराखड्याचे प्रशिक्षणही नायर रुग्णालयातील सभागृहात दिले. आपल्या विभागात कुठे आणि कसे आरक्षण पडले आहे; तसेच आराखड्यातील तांत्रिक बाबी कशा समजावून घ्याव्यात, याची माहितीही तज्ज्ञांनी दिली.