विकास झाला फक्त अंबानी, अदानींचा

0

जयपूर । केंद्रात भाजपच्या सत्ता स्थापनेस तीन वर्षे झाली आहेत. मात्र पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात फक्त अंबानी आणि अदानी यांचा विकास होत असल्याचा घरचा अहेर राजस्थानमधील भाजपचे आमदार घनश्याम तिवारी यांनी दिला आहे. ‘मोदींच्या सत्ताकाळात सर्वसामान्य नागरिकांचा स्तर उंचावण्यापेक्शा केवळ अंबानी आणि अदानी यांसारख्या मोजक्या लोकांचा विकास सुरु आहे. त्याचवेळी शेतकर्‍यांना त्रास सहन करावा लागतो आहे,’ अशी टीका भाजपचे आमदार राजस्थानमधील आमदार घनश्याम तिवारी यांनी केली. पंतप्रधान मोदीं करत असलेल्या विकासाच्या दाव्यावर ही तिवारी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारतीय अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत असली, तरीही सामान्य भारतीयांचा विकास मात्र झालेला नाही, असे घनश्याम तिवारी यांनी सांगितले.

‘डोक्यावर कर्ज नाही, असा एकही शेतकरी नाही. शेतकरी शेतमाल रस्त्यावर फेकून देत आहेत. दूध उत्पादक दूध रस्त्यावर ओतून देत आहेत. देशातील बेरोजगारी वाढत आहे. देशातील संपत्ती अवघ्या काही लोकांच्या हाती जात आहे. सर्व काही भांडवलशाहांच्या हातात गेले आहे,’ असे म्हणत घनश्याम तिवारी यांनी मोदी सरकारवर थेट शरसंधान साधले. घनश्याम तिवारी भाजपचे सांगनेरचे आमदार आहेत.

मोदी सरकारआधी आमदार घनश्याम तिवारी यांनी राजस्थानातील वसुंधरा राजे यांच्या सरकारवरही तोंडसुख घेतले. राजस्थान विधानसभेने एका प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामुळे राजस्थानच्या सर्व माजी मुख्यमंत्र्यांना सरकारतर्फे बंगला, कार आणि कर्मचारी दिले जाणार आहेत. राजस्थान सरकारकडून मंजूर करण्यात आलेला प्रस्ताव जनतेची ‘लूट’ असल्याची टीका घनश्याम तिवारी यांनी केली आहे. ‘मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी संबंधित प्रस्ताव अवघ्या पाच तासांमध्ये राज्यपालांच्या स्वाक्षरीशिवाय मंजूर करून घेतला.

‘शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचतो, त्यालाच लोकशाही म्हणतात, असे दिनदयाळ उपाध्याय म्हणायचेय. मात्र, सध्या फक्त अदानी-अंबानी यांच्यासारख्या निवडक व्यक्तींचाच विकास होतो आहे,’ अशी घणाघाती टीका करत भाजप आमदार घनश्याम तिवारी यांनी विकासाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.