कानपूर: आठ पोलिसांचे हत्याकांड घडवणारा गँगस्टर विकास दुबे आज सकाळी एन्काऊंटरमध्ये मारला गेला आहे. दरम्यान त्यांच्या एन्काऊंटरवरून आता राजकारण तापले आहे. विकास दुबेचा एन्काऊंटर राजकीय षडयंत्र असल्याचे आरोप होत आहे. यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विकास दुबेच्या एन्काऊंटरचे राजकारण कोणी करू नये, विकास दुबेकडून वारंवार कायदा-सुव्यवस्थेचे खच्चीकरण सुरु होते. त्यामुळे त्याला संपवणे आवश्यक होते अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
आज सकाळी विकासला कानपूरला नेले जात असताना पोलिसांच्या ताफ्यातील एका कारला अपघात झाला. विकास दुबे याच कारमध्ये होता. कार उलटताच त्याने पोलिसांकडील बंदूक घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत त्याचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्याभरापासून पोलिसांना विकास दुबेचा शोध सुरु होता.
विकास दुबे एका दिवसात मोठा झालेला गुंड नसून आजपर्यंत राजकीय पाठबळ मिळाल्याने त्यांना तो मोठा झाला असेही राऊत यांनी सांगितले. आता गुन्हेगारीचे राजकारण होत चालले आहे. विकास दुबेला एक पक्ष विधानसभेची उमेदवारी देणार होता असेही राऊत यानी सांगितले.