विजय माल्ल्या एक नंबरचा खोटारडा ;उद्धव  ठाकरे यांनी केली अरुण जेटलींची पाठराखण

0

मुंबई: भारतीय बँकाचे 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनला पळालेल्या विजय माल्याच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मी देश सोडण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती, असे विधान विजय माल्याने लंडन येथील वेस्टमिंस्टर न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलताना केले होते. अरुण जेटली आणि विजय माल्ल्या भेटीवरुन सध्या जोरदार टीकास्त्र सुरु आहे. यावर विजय माल्ल्या एक नंबरचा खोटारडा आहे. दारुड्यांवर आणि खोटारड्यांवर विश्वास ठेवू नये, असे सांगत  ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांनी अरुण जेटलींची पाठराखण केली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना आपण भेटलो हे मल्ल्याने इतक्या वर्षांनंतर कोर्टात सांगितले. काँग्रेसला या भेटीची कल्पना होती मग ते इतकी वर्षे दडवून का ठेवले, की काँग्रेसचा आणि माल्ल्याचा बोलविता धनी कुणी वेगळाच आहे? एकमेकांचे पाय कापण्याचे प्रयोग दिल्लीत सुरू आहेत. 2019 ची ही पूर्वतयारी आहे. जे नकोत त्यांना आताच छाटा. त्यात सुक्याबरोबर ओलेही जळत आहे. जेटली यांच्याबाबत नेमके तेच घडताना दिसत आहे, असे उद्धव  ठाकरे  यांनी म्हटले आहे.