एमआयटीतर्फे आयोजित संत श्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटन
पुणे : विज्ञानाने आज अतुलनीय भरारी घेतली आहे. माणसाच्या दैनंदिन जीवनासाठी त्याने अनेक सुविधा उत्पन्न केल्या आहेत. पण याच विज्ञानाची वाढत जाणारी प्रगती ही विनाशकारी बनत चालली आहे. म्हणून मानवजातीच्या रक्षणासाठी तिला अध्यात्माच्या आधारे नियंत्रीत करणे आवश्यक आहे, असे मत जगविख्यात संगणक तज्ञ व नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले. विश्वशांती केंद्र (आळंदी), पुण्यातील माईर्स एमआयटी आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या 23 व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव, प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, डॉ. सुचित्रा कराड नागरे, प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील याप्रसंगी उपस्थित होते.
लोकांना भक्तीच्या धाग्याने बांधले
आज संपूर्ण जग हे शांतीच्या शोधात आहे. भौतिक जगात नेत्रदीपक प्रगती होऊनसुद्धा लोक सुखी नाहीत. ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. खरे सुख हे अध्यात्माच्या मार्गात दडलेले आहे. भारतीयांनी महाकुंभमेळ्यासारखे उत्सव निर्माण केले आहेत. संपूर्ण जगातून त्या ठिकाणी कोट्यवधी लोक गोळा होतात. सर्व लोकांना भक्तीच्या धाग्याने बांधून ठेवण्यासाठी या गोष्टीलासुद्धा महत्त्व आहे. समृध्दी आणि शांती एकाच वेळी प्राप्त करण्यासाठी पूर्व आणि पश्चिम गोलार्धांचा संगम झाला पाहिजे. ज्ञानेश्वरी, गाथा, एकनाथी भागवद हे खरे ज्ञानाचे भांडार आहे, असे डॉ. विजय भटकर यांनी सांगितले.
अध्यात्म आणि विज्ञानाचा समन्वय झाला पाहिजे
या शतकाच्या शेवटी मानवजात शिल्लक असेल का, अशी शंका उत्पन्न होत आहे. त्याचेच उत्तर शोधण्यासाठी अध्यात्म आणि विज्ञानाचा समन्वय झाला पाहिजे. स्वामी विवेकांनद यांनी भाकीत केल्याप्रमाणे 21 व्या शतकात भारत माता ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येईल. देशाला जाती धर्माचा जो शाप लागला आहे त्या विळख्यातून बाहेर निघण्यासाठी अध्यात्म आणि मानवतेची गरज आहे, असे प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी सांगितले.