अमरावती । अमरावतीतील पंजाबराव देशमुख रुग्णालयात एकाच वेळी 4 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चारही नवजात मुलांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. काल रात्री (रविवार) ही घटना घडली आहे. एकाच वेळी चार नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानं त्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण
बालकांच्या मृत्यूप्रकरणी मनसे कार्यकर्ते आणि बालकांच्या नातेवाईकांकडून डॉ. भूषण कट्टा यांना मारहाण करण्यात आली आहे. डॉ. भूषण कट्टा हे बालकांच्या मृत्यू वेळी तिथेच ड्युटीवर होते आणि मुलांच्या मृत्यूला त्यांचा हलगर्जीपणाच जबाबदार आहे असा आरोप मृत बालकांच्या नातेवाईकांनी केला आहे.
मनसे कार्यकर्ते आणि मृतांचे नातेवाईक मुलांच्या मृत्यूचे कारण विचारण्यास थेट डीन दिलीप जाणे यांच्या कार्यालयात गेले. त्यावेळी डॉक्टर भूषण कट्टा हे देखील तिथं उपस्थित होते. त्याचवेळी ही मारहाण करण्यात आली. त्यामुळे आता हे प्रकरण अधिक चिघळले आहे. दरम्यान, बालकांचे शवविच्छेदन करायचे झाल्यास ते आमच्या आणि डॉक्टरांच्या एका टीमसमोर करण्यात यावे. तसेच त्यावेळी डॉ. भूषण हे देखील तिथे हजर असावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
बालकांच्या मृत्यूने एकच खळबळ माजली
पंजाबराव देशमुख रुग्णालयात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून लोक उपचारासाठी येत असतात. या चारही बालकांच्या मृत्यूने एकच खळबळ माजली आहे. रुग्णालयात काही उपचार सुरु असतानाच बालकं दगावल्याची माहिती समजते आहे. याप्रकरणी आता पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आणि रुग्णालयातील एक टीम या प्रकाराची चौकशी करणार आहे. त्यामुळे चौकशीनंतरच या बालकांच्या मृत्यूचं नेमके कारण समजू शकेल.
गोंदियात 15 दिवसात 18 नवजात बालकांचा मृत्यू:
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गोंदियाच्या गंगाबाई शासकीय रुग्णालयात मागच्या 15 दिवसात प्रसुती दरम्यान 18 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. गोंदियात मागच्या दीड महिन्यात एकूण 43 बालके दगावली आहेत. डॉक्टरांच्या मते, या रुग्णालयात येणार्या महिला ह्या ग्रामीण भागातून येतात. त्यांना सकस आहार न मिळाल्याने त्यांचे अर्भकही अशक्त असते आणि त्यामुळेचं या बालकांचा मृत्यू होतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तर रूग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने वेळीच उपचार मिळत नाहीत. त्यामुळेही बाळांचा आणि मातांचाही मृत्यू होतो असा आरोप नातेवाईकांनी केला होता.