जळगाव प्रतिनिधी । विद्यापीठ, सहसंचालक कार्यालय अन् महाविद्यालये यांच्यात सुसंवादासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मंगळवारी झालेल्या सहविचार सभा झाली.
सभेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा. पी. पी. पाटील हे होते. या वेली उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. केशव तुपे, कुलसचिव बी. बी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. ए. बी. चौधरी, वित्त व लेखा अधिकारी डॉ. बी. डी. कर्हाड उपस्थित होते. साडेतीन तास चाललेल्या या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. प्राचार्यांकडून उपस्थित झालेल्या सर्व शंकाचे कुलगुरू प्रा. पाटील व सहसंचालक डॉ.तुपे यांनी निरसन केले. विविध प्राचार्यांनी काही मुद्दे उपस्थित केले.
शासनाकडून रिक्त पदे भरण्यास परवानगी दिली जात नाही. त्यामुळे शिक्षणाच्या दर्जावर परिणाम होत असून तातडीने ही पदे भरली जावीत, तासिका तत्वावर उमेदवार भरताना रोस्टर प्रमाणे त्या संवर्गातील उमेदवार न मिळाल्यास इतर संवर्गातील उमेदवार भरण्यास मान्यता मिळावी, शैक्षणिक शुल्काचे नव्याने निर्धारण केले जावे, महाविद्यालयांना वेतनेतर अनुदान मिळावे, शिष्यवृत्तीचे पैसे तातडीने दिले जावे, परीक्षांचे मानधन महाविद्यालयांना वेळेवर व त्याच आर्थिक वर्षात दिले जावे, महाविद्यालयांचे अॅकॅडमीक ऑडिट केले जावे, विद्यार्थी संसदेच्या निवडणुका होणार असतील तर विद्यापीठाने आचारसंहिता तयार करुन महाविद्यालयांना द्यावी, चॉइस बेस क्रेडिट प्रणालीमुळे कार्यभार वाढणार असेल तर तो मान्य केला जावा आदी विविध मागण्या प्राचार्यांच्या वतीने करण्यात आल्या.
महाविद्यालयांनी तातडीने त्यांच्या महाविद्यालयांचे अनुधारण करुन घ्यावे. तासिका तत्वावर एखाद्या शिक्षकाची नेमणूक केल्यास आठवड्याला सात तासांपेक्षा अधिक तासिका दिल्या जावू नयेत. तसेच यापुढे उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत दिल्या जाणार्या शिष्यवृत्ती संबंधितांना वेळेवर देण्यासाठी नवीन पोर्टल तयार करण्यात आले आहे. ते लवकरच कार्यान्वित होणार आहे, अशी माहिती उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. केशव तुपे यांनी दिली.
प्रास्ताविक कुलसचिव भ. भा. पाटील यांनी केले. जनसंपर्क अधिकारी डॉ. सुनील पाटील यांनी सूत्रसंचालन केले.