सावदा । कॉपीच्या विळख्यामुळे गुणवत्तेला जंग लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉपीच्या प्रकारापासून परावृत्त करण्यासाठी पालकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. यश मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. वर्तमानातील मेहनतीमुळे भविकालानी यशाची पायाभरणी होते, असे प्रतिपादन सावदा पालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी केले. आं.ग. हायस्कूल ना.गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता दहावी आणि बारावी परिक्षांच्या पार्श्वभूमीवर आयोजित शिक्षक-पालक मेळाव्यात ते बोलत होते.
मान्यवरांनी मांडले विचार
आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी त्यांना वाममार्गाचे दुष्परिणाम सांगा. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये शाळेपुरते नाते असते. मात्र, पालकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी नेहमी उपयोगी ठरते. त्यामुळे परिक्षाकाळातील कॉपीमुळे मिळालेले यश क्षणभंगूर असते, ही बाब पालकांनी वेळीच विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून द्यावी. कॉपीमुळे गुणवत्ता सिद्ध होत नाही. त्यामुळे अभ्यासावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले. मुुख्याध्यापक सी.सी.सपकाळे, एस.एम.महाजन यांनीही विचार मांडले. नंदू पाटील यांनी सूत्रसंचालन केले. पी.जी.भालेराव यांनी आभार मानले. शिक्षक-पालक संघाचे किशोर वाणी, आत्माराम तायडे, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहायक पोलिस निरीक्षक जयंत सातव यांनीही मार्गदर्शन केले. परीक्षेच्या काळात पालकांना परीक्षा हॉल परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना कॉपीपासून परावृत्त करावे. कॉपी पुरवणार्यांवर पोलिस प्रशासनातर्फे कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.