विद्युत तारांचे जाळे जीवघेणे!

0

तळोदा । तळोदे शहरातील जीर्ण विद्युत तारा, लोंबकळणार्‍या तारा तसेच जीर्ण व वाकलेले खांब आणि घरांच्या जवळ असलेले विद्युत तारा बदलणे अश्या विविध मागण्यांचे निवेदन शिवसेनेच्या वतीने सहाय्यक अभियंता सचिन काळे यांना देण्यात आले. येत्या 15 दिवसात या तक्रारींचे निवारण झाले नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करीत, वीज वितरण कंपनीला धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही तसेच यातून होणार्‍या सर्व परिणामास महावितरण कंपनी जबाबदार राहील असा इशारा सुध्दा निवेदनातून देण्यात आलेला आहे. यावेळी म. वि. मं. इम्रान पिंजारी तसेच समस्याग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वीज वितरण विभागाकडून आर्थिक लूट
नवीन वसाहतीत विद्युत तारांचा लाईन शिफ्टिंगचे व नविन पोल टाकण्याचे काम करण्यात येत आहे आणि या कामांसाठी जनतेकडून मोठ्या प्रमाणात चुकीच्या पद्धतीने वीज वितरण विभागाकडून आर्थिक लूट केली जात आहे. तसेच अचानक उच्च दाबाचा पुरवठा होवून लाखोचे उपकरणे जळून खाक झाल्याची घटनेत वाढ झाली आहे. जिल्ह्याच्या विचार करता तळोदा तालुका हा विद्युत वीज वसुली मध्ये 1 नंबरला आहे. मात्र वीज वितरण विभागाच्या गलथान कामामुळे वीज बिले भरुन ही जनतेला जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे असे निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदनावर शिवसेना तालुका प्रमुख अनुप उदासी, शहर प्रमुख जितेंद्र दुबे, नगरसेविका कोमलताई सोनार, संजय पटेल, सिमाताई गिरणार, आनंद सोनार, प्रदीप माळी, काशिनाथ कोळी, देवा कलाल, श्रावण तिजविज, अजय रघुवंशी, जगदीश चौधरी, इम्रान शेख, भूषण कलाल तसेच नागरिकांचा स्वाक्षर्‍या आहेत.

बालकांच्या जीवाला धोका
सदर निवेदनात म्हटले आहे की, तळोदा शहरात वीज वितरण कंपनीचे विद्युत तारांचे पसरलेले जाळे हे जीव घेणे ठरत आहे. घराच्या लोखंडी जिन्यावरुन, गॅलरीवरुन व घराच्या स्लॅबवरुन हाताने स्पर्श होईल एवढ्या अंतरावर विद्युत लाईन टाकण्यात आल्या आहेत. स्वतःच्या मालकीचे घर असून देखील घरा बाहेर गॅलरीत उभे राहणे कठीण बनले आहे तसेच लहान बालकांचा जीवाला धोका निर्माण झाला आहे. जीर्ण तारा व घरावरुन गेलेल्या विद्युत तारांमुळे शहरात मनुष्यहानी झाल्याचे प्रकार मागे घडले आहेत. यात प्रा. हेमंत शुक्ला तर हरकलाल नगर येथे कलर काम करतांना संदीप पाडवी याच्या सह काहींना जीव गमवावा लागला आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच दामोदर नगर येथे विद्युत तारांमुळे एक ट्रॅक्टर टायर पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. तसेच लोंबकळणार्‍या तारांमुळे दरवर्षी शेतातील शेकडो एकर ऊस जळून खाक होत आहे आणि आस्मानी व सुलतानी संकटांना तोंड देणार्‍या शेतकर्‍यांना आता विजवितरण देखील मोठे संकट ठरत आहे.

तळोदा शिवसेनेतर्फे विजवितरण विभागाच्या भोंगळ कामकाजाच्या विरोधात शहरातील स्मारक चौकात, महावितरण तर्फे मरण स्वस्त आहे, मेल्यावर भरपाई देण्यापेक्षा जिवंतपणी सुविधा द्या. अश्या आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे आणि विज वितरण विभागाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

शहरातील विजेच्या समस्या माझ्या स्तरावरील आहेत, त्याबाबत सर्वे करुन 10 ते 15 दिवसांत त्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल. बाकी समस्यांबाबत इस्टीमेट तयार करुन वरिष्ठांचा मंजुरीस पाठविण्यात येईल आणि त्यासमस्यांचे सुद्धा निराकरण करण्यात येईल.
– सचिन काळे,सहाय्यक अभियंता