विमानतळाला पुरंदरच्या हितासाठी विरोध नको!

0

सासवड । एखादा प्रकल्प होत असताना संबंधित शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित कराव्या लागतात. त्यामुळे थोडे दुःख होणे स्वाभाविक आहे. म्हणून संपूर्ण प्रकल्पाला विरोध करणे योग्य नाही. पुरंदर तालुक्यात नव्याने आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प होत असल्याने यामुळे केवळ पुरंदरच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्हा आणि परिसरांतील पाच ते सहा जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. तसेच हा प्रकल्प म्हणजे पुरंदरचे भाग्य बदलणारा प्रकल्प आहे. त्यामुळे याबाबत शेतकर्‍यांनी विरोधाची भूमिका न घेता शेतकर्‍यांना मोबदला देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न होतील. तसेच शेतकर्‍यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा आणि तो प्रश्‍न सोडवावा, असे स्पष्ट प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले आहे. काळेवाडी (ता. पुरंदर) येथे अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक संघ, पुणे व जैन इरिगेशन सिस्टीम, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या राज्यस्तरीय अंजीर परिषद आणि अंजीररत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे हे परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते.

उसापेक्षा फळबाग लागवड करा!
शरद पवार म्हणाले की, शेतकर्‍यांनी बदलत्या काळानुसार पिक पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. तसेच ज्या भागात पाणी आहे; त्याभागात आधुनिक पद्धतीने शेती करून फळबाग लागवड करावी. तर ज्या भागात कमी पाणी आहे त्या भागातील शेतकर्‍यांनी पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहण्याऐवजी शेतीपूरक व्यवसाय तसेच छोटे-मोठे उद्योग सुरू करावेत. त्याचप्रमाणे पुरंदर येथे विमानतळ प्रकल्प होत असल्याने उद्योग व्यवसायाच्या अनेक मोठ्या संधी उपलब्ध आहेत. प्रकल्पासाठी भूसंपादन होणार असले तरी प्रकल्पाबाहेरील एक इंचही जमिनीचे संपादन होणार नाही. त्यामुळे त्या भागात उद्योग सुरू करण्यास मोठा वाव आहे. गुंजवणी धरणाच्या पाण्याबाबत पवार म्हणाले की, पुरंदरमध्ये टंचाई कायम आहे व पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. त्यामुळे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून पाणी येत असताना त्यामध्ये मतभेद करण्यापेक्षा तालुक्यात पाणीसाठा कसा वाढेल याचवर सकारात्मक चर्चा करा. त्या पाण्यावर उसाचे पिक घेण्यापेक्षा फळबाग लागवड करण्याचे नियोजन करा, असाही सल्ला दिला.

अजीराचा जागतिक बाजारपेठेत वाटा किती?
राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले की, शेतकर्‍यांनी अंजीर या फळपिकांचे उत्पादन घेत असताना जागतिक बाजारपेठेत आपला वाटा किती याचा व्यापक विचार करावा. त्याचप्रमाणे राज्याचे कृषिमंत्री यांच्यासोबत शेतकरी यांच्यासोबत बैठक लावून अंजिराची आयात आणि निर्यात याबाबत चर्चा केली जाईल. या प्रसंगी आत्माचे प्रकल्प संचालक सुनील बोरकर, अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक संघाचे अध्यक्ष रवींद्र नवलाखा, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे दिवे येथील अंजीर संशोधन केंद्राचे माजी प्रमुख अधिकारी डॉ. विकास खैरे यांनी अंजीर फळबागेची लागवड, हवामान, खतांचे प्रमाण, प्रतवारी, मार्केटिंग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रसंगी राज्य कृषी परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते, म्हाडाचे माजी अध्यक्ष संभाजी झेंडे, माजी आमदार अशोक टेकवडे, पंचायत समितीचे सभापती अतुल म्हस्के, माजी जि. प. सदस्य सुदाम इंगळे, सारिका इंगळे, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिगंबर दुर्गाडे, तहसीलदार सचिन गिरी, माजी उपसभापती माणिकराव झेंडे, विशाल पतसंस्थेचे अध्यक्ष सौरभ कुंजीर, त्याच प्रमाणे राज्याच्या विविध भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक संशोधन संघाचे अध्यक्ष रवींद्र नवलाख, उपाध्यक्ष रामचंद्र खेडेकर, सचिव सुरेश सस्ते, खजिनदार प्रदीप पोमण यांनी या परिषदेचे आयोजन केले होते.