सिंधू कोल्हे गैरहजर असल्याने पुन्हा समन्स
जळगाव : विमानतळ योजनेतील गैरव्यवहार व अनियमितता प्रकरणी दाखल गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल झाले आहे. यात 8 फेब्रुवारी काही संशयित गैरहजर असल्याने न्यायालयाने सर्वांना हजर राहण्यासाठी 14 फेब्रुवारी ही तारिख दिली होती. त्यानुसार सिंधू विजय कोल्हे वगळता इतर सहा संशयित गुरुवारी न्यायालयात हजर झाले. न्या.बी.डी.गोरे यांच्या न्यायालयात कामकाज होवून न्यायालयाने रोख 20 हजार रुपये, 20 हजार रुपयांचा जातमुचलका तसेच 20 हजाराचा पी.आर.बॉन्ड अशा प्रत्येकी 60 हजार रुपयांच्या रकमेवर सहा जणांना जामीन मंजूर केला.
तत्कालिन नगरपालिकेतर्फे विमानतळ योजना राबविताना 3 कोटी 18 लाख रुपयांचा गैरव्यवहार व अनियमितता झाल्याची तक्रार तत्कालिन नगरसेवक नरेंद्र भास्कर पाटील यांनी दिल्यावरुन 2012 मध्ये जळगाव शहर पोलीस स्टेशनला भाग 5, गु.र.नं.110/2012 भादवि कलम 403, 406, 409, 420 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. तपास अधिकारी प्रशांत बच्छाव यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यावर 8 फेब्रुवारी रोजी संशयितांना हजर राहण्याबाबत समजपत्र बजाविण्यात आले होते. त्यानुसार 8 रोजी न्या. आर.डी.सिदनाळे यांच्या न्यायालयात कामकाज झाले होते. मात्र यात प्रदीन रायसोनी, सिंधू कोल्हे, लक्ष्मीकांत चौधरी, राजू ए.बरोत हे गैरहजर असल्याने सर्वांना हजर होण्यासाठी 14 फेब्रुवारी ही तारिख देण्यात आली होती.
या सहा जणांना झाला जामीन
14 रोजी न्यायालयात गुन्ह्यातील संशयित तत्कालिन नगरपालिकेचे उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष असलेले प्रदीन ग्यानचंद रायसोनी, लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी, चत्रभूज सोमा सोनवणे, मुख्याधिकारी पंढरीनाथ धोंडीबा काळे, धनंजय दयाराम जावळीकर व अॅटलांटा कंपनीचे संचालक राजू ए.बरोत हे दुपारी 3 वाजता प्रत्यक्ष हजर झाले. न्या.बी.डी.गोरे यांच्या न्यायालयात त्यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला. यात. न्या. गोरे यांनी सहा जणांना प्रत्येकी 60 हजार रुपयांच्या रकमेवर जामीन मंजूर केला. रायसोनी, चौधरी व बरोत या तिघांतर्फे अॅड. प्रकाश पाटील तर चत्रभूज सोनवणे यांच्यातर्फे अॅड. गोविंद तिवारी तर पी.डी.काळे यांच्यातर्फे अॅड. नितीन जोशी तर धनंजय जावळीकर यांच्यातर्फे अॅड. अकील ईस्माईल यांनी काम पाहिले.
सिंधू कोल्हे यांना पुन्हा बजावला समन्स
न्यायालयात 8 रोजी कामकाजावेळी संशयित तत्कालीन नगराध्यक्ष सिंधू कोल्हे या गैरहजर होत्या. न्यायालयात त्यांच्यातर्फे कुणीही हजर नव्हते तसेच वकिलांमार्फत अर्जही दाखल झाला नव्हता. त्यामुळे हजर होण्यासाठी न्यायालयाने त्यांना समन्स काढले होते. त्या 14 रोजी हजर न झाल्याने त्यांना न्यायालयाने पुन्हा समन्स काढले आहेत.