विराटच्या टीकेला बीसीसीआयचे प्रत्युत्तर

0

नवी दिल्ली । दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍याआधी सुरु असलेल्या श्रीलंका दौर्‍याच्या नियजोनावरून विराट कोहलीने बीसीसीआयवर आगपाखड केली होती. विराट कोहलीच्या या टीकेवर आता बीसीसीआयने प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहलीचे हे मत गंभीरतेनं घेण्याची गरज असल्याचे वक्तव्य बीसीसीआयचे कार्यवाहक अध्यक्ष सी.के.खन्ना यांनी केले आहे. विराट भारतीय संघाचा कर्णधार आहे आणि क्रिकेटबाबत विराटने केलेल्या वक्तव्याकडे गंभीरतेने पाहिले पाहिजे. खेळाडू थकत असतील तर त्याचाही विचार व्हावा, असे खन्ना म्हणाले. भविष्यात घरच्या मैदानात होणार्‍या मालिकेच्या नियोजनावर लक्ष दिले जाईल, अशी ग्वाही खन्ना यांनी दिली. खेळाडूंना विश्रांती न देता लागोपाठ तीन मालिकांचे आयोजन करणे कितपत योग्य आहे, याबाबत योग्य ठिकाणी प्रश्‍न उपस्थित केले पाहिजेत. या मुद्द्यावर 9 डिसेंबरला होणार्‍या बैठकीमध्ये चर्चा झाली तर चांगले होईल, असे खन्ना म्हणाले.

काय म्हणाला होता विराट?
कोणत्याही मालिकेच्या तयारीसाठी किमान एका महिन्याचा वेळ मिळायला हवा. मात्र, तो मिळत नाही. नाईलाजाने आम्हाला मिळेल त्या वेळात तयारी करावी लागते. या सार्‍याचा खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होतोय, अशी खंत व्यक्त त्याने केली. दक्षिण अफ्रिकेच्या दौर्‍याआधी आमच्या हातात केवळ दोन दिवस आहेत. आमच्याकडे याशिवाय दुसरा पर्याय नाही. या दोन दिवसांत आम्हाला सर्व तयारी करावी लागणार आहे. सध्या श्रीलंका मालिका सुरु आहे. आणि स्वत:ला फिटही ठेवावे लागणार आहे, असे विराटने बोलून दाखवले. क्रिकेट खेळाचे वेळापत्रक व्यस्त आहे. कोणताही परदेश दौरा असला तर अन्य संघ तयारीसाठी खूप वेळ घेतात. कसोटी मालिका संपल्यानंतर क्रिकेटपटूंच्या कामगिरीवर बोलेल जाते. वेळप्रसंगी टीकाही केली जाते. मात्र, वेळ नसेल तर खेळाडू तरी काय करणार, असे थेट सवाल विराटने उपस्थित केला होता.