विराट कोहलीचा दणका

0

नवी दिल्ली । लागोपाठ क्रिकेट आणि व्यस्त दौर्‍यांमुळे त्रासावलेला भारतीय संघाचा वैतागलेला कर्णधार विराट कोहली याने बीसीसीआयच्या भरगच्च वेळापत्रकाबाबत नाराजी व्यक्त केली होती. या मुद्द्यावर त्याला सौरव गांगुलीसारख्या माजी खेळाडूचंही समर्थन मिळालं होतं. त्यामुळे कदाचित विराट कोहलीला श्रीलंके विरूद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेमधून विश्रांती देण्यात आल्याचे बोलले जात आहे. या मालिकेसाठी त्याच्याजागी रोहित शर्माकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. विराटच्या या संतापामुळे बीसीसीआयचे डोके ठिकाण्यावर आल्याचे दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सतत क्रिकेट खेळत असलेल्या भारतीय संघाचे सामने आता कमी होण्याची शक्यता आहे. त्याचे संकेत प्रशासक समिती प्रमुख विनोद राय यांनी दिले आहेत.

भारतीय संघ 24 डिसेंबरला श्रीलंके विरूद्धची मालिका खेळेल. नंतर 28 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेसाठी भारतीय संघ रवाना होईल. त्यांना 30 डिसेंबरला सामने सुरू होण्याआधी एक अभ्यास सामना खेळावा लागेल. कोहलीने तक्रार केली होती की, व्यस्त कार्यक्रमामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेच्या महत्वपूर्ण दौर्‍याच्या तयारीसाठी पूर्ण वेळ मिळाला नाही. यावर विनोद राय म्हणाले की, मी विराट्च्या वक्तव्यावर सहमत आहे. असे होत आहे. आता आम्ही पैशांसाठी आमच्य किंमती खेळाडूंचा बळी देणार नाही. आम्ही पुढील वर्षी याकडे लक्ष देऊ की, तिन्ही प्रकारांमध्ये संतुलन असावे.

चर्चा करणार
ते म्हणाले की, दिल्ली कसोटीसामन्या दरम्यान खेळाडू आपले प्रेझेंटेशन देतील. तेव्हाच त्यांच्या या मुद्द्यावर त्यांचे सल्लेही घेतले जातील. आम्ही संघासोबत भविष्यातील दौर्‍यांबाबतही बोलू. ज्याप्रकारचे वेळापत्रक आहे ते पाहता सामन्यांची संख्या कमी करणे हाच एकमेव उपाय आहे. 2019 पासून ते 2023 पर्यंतचा कार्यक्रम तयार केला जात आहे. त्यात क्रिकेट खेळण्याचे दिवस कमी केले जाऊ शकतात.