विविध साधनांद्वारे जाहिरात केल्याने नवीन उद्योगनिर्मिती

0

जळगाव । देशात सामाजिक समस्या खूप आहेत. सामाजिक गरजांच्या विश्‍लेषणातून उद्योजकतेच्या संधी सापडत जातात. स्वतःच्या कल्पनांचे डिझाईन तयार करा. त्याचा अभ्यास करून विविध साधनांच्या सहाय्याने जाहिरात करा, यातूनच नवीन उद्योग जन्माला येतो. ‘डेड माइंड’ ऐवजी ‘लाईव्ह माइंड’ ठेवला तर निश्‍चितच विविध क्षेत्रात अपेक्षेपेक्षा अधिक यश कमवाल, असे प्रतिपादन रिलायन्स जिओचे सहाय्यक उपाध्यक्ष डॉ.मुनीर सय्यद यांनी केले. बांभोरी येथील श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजित ‘फिस्ट’ व्याख्यानमालेत तिसर्‍या दिवशी ते ‘उद्योजक होण्यासाठी संधी’ या विषयी बोलत होते.

विविध विषयांवर केले मार्गदर्शन
ते पुढे म्हणाले की, वाचन, चिंतन, मनन हि विद्यार्जनाची प्रक्रिया आहे. मनन म्हणजे चारही बाजूने विचार केल्यानंतर जेव्हा समस्येचे उत्तर मिळेल तेव्हा तुम्ही उद्योजक बनण्याकडे वाटचाल करतात. संधी शोधता आली पाहिजे. त्यासाठी ज्ञान, कौशल्य हवेतच. पारंपारिक आणि गोंधळलेल्या अवस्थेतील तरुण केवळ गोंधळच निर्माण करतात. आभासी, कृत्रिम जगात अडकण्यापेक्षा स्वतःला कोठे करिअर करायचे हे तुम्हीच ठरवा, असे ते म्हणाले. ‘टेक्नीकल ट्रेंड’ हा बदलत राहणारा आहे. कोणतेही तंत्रज्ञान कायमस्वरूपी नाही. दर्जात्मक शिक्षण घेण्याकडे आपला कल असावा. त्यामुळे नवीन स्वदेशी तंत्रज्ञान तरुणांनी बनवावे, त्याबाबतची उदासीनता दूर करावी, असेही त्यांनी आवाहन केले.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
सत्रअध्यक्ष म्हणून डॉ.एस.पी.शेखावत तसेच प्राचार्य डॉ.के.एस.वाणी व अर्की. शशिकांत कुलकर्णी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.पी.व्ही.ठाकरे यांनी तर आभार आणि तीन दिवसीय व्याख्यानमालेचा आढावा प्रा.एम.एम.अन्सारी यांनी घेतला. व्याख्यानमालेसाठी प्रा.एन.एम.काझी, डॉ.एस.ए.ठाकूर, प्रा.व्ही.पी.सांगोरे, प्रा.सुधीर पाटील, प्रा. कृष्णा श्रीवास्तव, डॉ.पी.जी.दामले, प्रा.मनोज पाटील, प्रा. धनेश पाटील, प्रा. दिनेश पुरी, प्रा.नितीन जगताप, प्रा.मीरा देशपांडे, प्रा.सारिका पवार आदींनी परिश्रम घेतले.