विशाखापट्टणम: पॉलिमर कंपनीत झालेल्या विषारी गॅस गळतीमुळे ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ८ वर्षांच्या एका मुलीसह दोन जेष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. एकूण ५०० जणांना या गॅस गळतीची बाधा झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या विषारी वायूच्या गळतीमुळे तीन किमीच्या परिसरावर परिणाम झाला असून आतापर्यंत एकूण ५ गावांमधील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
आर. आर. वेंकटपुरम येथे असलेल्या विशाखा एल. जी. पॉलिमर कंपनीत विषारी वायूची गळती झाली आहे. या विषारी वायूमुळे शेकडो लोकांना डोकेदुखी, उलटी आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही वायू गळती नेमकी कशामुळे झाली याबाबत कळू शकलेले नाही.