भुसावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरू असल्याने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी साजरी होणारी जयंती घरीच साजरी करावी, असे आवाहन आंबेडकरी चळवळीतील मान्यवरांनी अनुयायींना केले आहे.
कोरोना मुक्तीसाठी करावी प्रार्थना
यंदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी म्हणजे 14 एप्रिल रोजी 11 वाजता आपण आपल्या कुटुंबियांसह घरीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या प्रतिमांना वंदन करावे व सर्वांनी ठरलेल्या एकाच वेळी बुध्द वंदना ग्रहण करण्याचा संकल्प करावा तसेच हे विश्व कोरोना व्हायरसपासून मुक्त व्हावे या मैत्री भावनेने आपल्या सर्वांच्या बुध्द वंदनेचा आवाज अख्ख्या विश्वात व देशात घुमेल, असा विश्वास आपण सर्वांनी बाळगावे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की, मी प्रथम व अंतिम देखील भारतीय आहे तेच मनात धरून आपल्यांना सामंजस्यपणा दाखवायचा आहे. आपल्या देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटाचा सामना आपण सर्वांनी मिळून करावयाचा आहे. आपल्या देशातील घटना ही आपल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केली आहे. आपण सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहोत हेच मनात धरून आपण सर्वांनी आपल्या बाबांची जयंती शांत पध्दतीने आपापल्या परीवारासोबत साजरी करावी, असे
रीपाइंचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी, रीपाइंचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, माजी नगरसेवक जगन सोनवणे, भारीपा जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, राष्ट्रवादीचे नगरसेवक उल्हास पगारे, युवा तालुका अध्यक्ष रवी सपकाळे, संघटक गिरीष तायडे आदींनी केले आहे.