जळगाव । मराठी प्रतिष्ठान, परेश फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गिरणाई महाराष्ट्र खाद्य व टुरीझम महोत्सवाचे आयोजन सागर पार्क येथे करण्यात आले आहे. शुक्रवार 22 रोजी या महोत्सवास शुभारंभ झाला. यामध्ये पाककला तज्ज्ञ विष्णू मनोहर व महाराष्ट्र किचन क्वीन प्राजक्ता शाहपूरकर यांच्या अनोख्या चवीने 500 किलो सेंद्रीय भाजी बनविण्यात आली. एकाच वेळी व एकाच पातेल्यात तयार करण्यात आलेल्या या 500 किलो भाजीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
शंभर पदार्थ स्टॉलवर उपलब्ध
भाजीची ही कला पाहण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. यानंतर अनेकांनी ही भाजी घरी घेऊन जात तिचा आस्वाद घेतला. या अनोख्या महोत्सवात जळगावकरांनी आनंद लुटला. या महोत्सवात 100 विविध पदार्थ एकाच स्टॉलवर उपलब्ध करुन देण्यात आले असून त्यात गृहपयोगी वस्तूंचा देखील समावेश आहे. 22 ते 26 डिसेंबर दरम्यान दररोज सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार असून दुपारी 4 ते रात्री 10 दरम्यान खाद्य महोत्सवाचा आनंद लुटता येणार आहे. यावेळी मराठी प्रतिष्ठानचे अॅड.जमील देशमांडे, परेश फाऊंडेशनचे प्रमोद बर्हाटे उपस्थित होते. चला सेंद्रिय भाजी बनवू या अंतर्गत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसभर महोत्सवास दिग्गज व्यक्तिंनी भेटी दिल्या. भाजी घेण्यासाठी महोत्सवस्थळी रांगा लागलेल्या होत्या.