यावल- तालुक्यातील शिरसाड येथे गावालगतच्या शेतात ठिबक नळ्या लावतांना विहिरीत तोल गेल्याने पंधरावर्षीय मुलाचा दुदैवी अंत झाल्याची घटना बुधवार, 12 रोजी सकाळी घडली. याबाबत पोलिसात नोंद करण्यात आली असून घटनेबाबत गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.शिरसाड, ता.यावल येथील गावालगत वासुदेव सोमा टेकडे (रा.भालोद) यांच्या शेतात बुधवारी सकाळी साडेआठ वाजे दरम्यान मजुरांकडून ठिबक नळ्या लावण्याचे काम चालू होते. यावेळी रवींद्र संजय अलकरी (राजपूत, 15) याच्यासह सागर बारेला (रा.बोरावल) व करण भिलाला (रा.बनुर, मध्यप्रदेश) या दोघे मजूरही ठिबक नळ्या लावण्याचे काम करीत होते. नळ्या ओढण्याचे काम करत असतांना रवींद्रचा जवळच असलेल्या विहिरीत तोल गेला. विहिरीत पडताच डोक्याला जबर मार लागल्याने रवींद्रचा विहिरीतच दुर्दैवी अंत झाला. त्याचा पायही मोडला गेला. या दुदैवी घटनेची वार्ता कळताच गावकर्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत उतरणार्यांच्या मदतीने मयत रविंद्रचे शव विहिरीतून बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला. त्यानंतर साकळीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर पाटील यांनी यावल ग्रामीण रुग्णालयात मयताचे शवविच्छेदन केले. उशिरापर्यंत यावल पोलिसात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. अचानक घडलेल्या घटनेने गाव परीसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. मयत रविंद्रच्या पश्चात आई, वडील, दोन मोठ्या बहिणी, लहान भाऊ असा परीवार आहे. मयत रवींद्रच्या घरची परिस्थिती अतिशय नाजूक असून आई-वडील शेतमजुरी करतात.