भुसावळ। आगामी काळात रेल्वेच्या भुसावळ विभागात वीज बचत आणि सौर उर्जा वीज निर्मितीला प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती मंडळ रेल्वे प्रबंधक सुधीरकुमार गुप्ता यांनी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. बुधवार 1 रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यात रेल्वेला काय मिळाले यावर पत्रकारांना माहिती देतांना गुप्ता म्हणाले की, रेल्वे आगामी काळात प्रवाशांची सुरक्षा, संरक्षा मिळणारा निधी व त्यातुन विकास कार्य, स्वच्छता तसेच वित़्तीय आणि लेखा सुधार यावर विशेष भर देणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय संरक्षा कोषाची स्थापना करण्यात येणार आहे़ आगामी पाच वर्षात एक लाख करोड रूपयांचा निधी यात जमा केला जाईल़
दिव्यांगांसाठी उद्वहन कक्ष
2020 पर्यंत सर्व ब्रॉड गेज लाईनवरील मानव रहित समपार फाटक बंद करण्यात येणार आहे़ तसेच नवीन रेल्वे मार्ग टाकणे, दुहेरीकरण करणे, आणि आमान परिवर्तन करणे गेज कन्र्व्हशन यालासुध्दा चालना देण्यात येणार आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी 500 स्थानकांवर उदवहन कक्ष लिप्ट आणि सरकते जिने यांची सुविधा देण्यात येणार आहे़
स्थानकांवर बसविणार लिफ्ट
सध्या भुसावळला दोन ठिकाणी जिने उपलब़्ध आहे तर नाशिक, मनमाड येथे दोन, जळगाव, अकोला व खंडवा येथे प्रत्येकी एक लिप्ट लावण्यात येणार आहे़ पाणी बचतीसाठी रिसायकलिंग प्लँटची निर्मिती करण्यात येणार आहे.
कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देणार
कॅशलेस व्यवहारांमध्ये रेल्वेने पुढाकार घेतला असुन विभागातील महत्वाच्या स्थानकांमध्ये 40 पैकी 39 ठिकाणी आरक्षण केंद्रांवर स्वाईप मशीन्स पॉईंट ऑप सेल्स लावण्यात येणार आले आहे़ यामुळे रेल्वेच्या कॅशलेस व्यवहारांमध्ये अंदाजे 10 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. लवकरच 16 मालवहन पार्सल ठिकाणी देखील स्वाईप मशीन लावण्यात येणार असुन सध्या देवळाली, बडनेरा व अकोला येथे या मशीन्स कार्यरत आहे. भुसावळ विभागातील जलंब खामगाव सेक्शन मधील तीन समपार पाटक आगामी मार्चपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे असेही गुप्ता यांनी सांगितले. यावेळी अप्पर मंडळ रेल्वे प्रबंधक अरूण धार्मिक, मंडळ चिकित्सा अधीक्षक डॉ. सी एन पिंप्रीकर उपस्थित होते.
एलईडी बल्बचा वापर
वीज बचतीसाठी एलईडी बल्बचा वापर पुर्ण भुसावळ विभागातील सर्व स्थानकांवर केला जाणार आहे. सध्या ईगतपूरी ते मनमाड मधील सर्व स्थानकांवरील लाईट बदलविण्यात आले असुन त्याठिकाणी एलईडी बल्बचा वापरण्यात आलेल आहेत. लवकरच विभागातील उर्वरित सर्व स्थानकांवर एलईडी बल्ब लावण्यात येणार आहेत. तसेच वीज बचतीसाठी सौर उर्जा हा पर्याय विभागात वापरण्यात येणार असुन सध्या रेल्वेच्या नाशिक येथील ईरिन प्रकल्पावर 30 किलोवॅट,भुसावळ मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयाच्या छतावर 10 किलोवॅट तर क्षेत्रिय प्रशिक्षण संस्था येथे 500 किलोवॅटचे सौर उर्जा निर्मितीचे पॅनल बसविण्याची डिआरएम गुप्ता यांनी दिली.