वीज बिल वसुलीसाठी मेळावे घ्या

0

शहापूर । मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना 2017 च्या परिणामकारक अंमलबजावणीकरिता सरकारने विरोधी पक्षाच्या आमदारांनाही पत्र पाठवून कृषी पंप धारक वीज ग्राहकांच्या वीज बिलांचा भरणा म्हणजे बिल देयक वसुली करण्यासाठी मतदारसंघात ग्राहक मेळावे व शिबीरे घेण्यास सांगितले आहे. सरकारचा हा अजब फतवा असून आमदारांना एवढेच काम बाकी होते का? असा सवाल शहापूर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी नाराजी व्यक्त करून शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन खंडित केल्यास जनआंदोलनाचा इशारा दिला आहे. तर कर्जमाफी आणि वीज बिल तात्काळ माफ करण्याची मागणीही केली आहे.

वीज खंडीत केल्यास जनआंदोलनाचा इशारा
आमदार पांडुरंग बरोरा यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार पांडुरंग बरोरा यांना पत्र पाठवून कृषिपंपधारक वीज ग्राहकांच्या म्हणजेच शेतकर्‍यांकडून वीज बिल भरणा करण्यासंदर्भात आपल्या मतदारसंघात मेळावे व शिबीरे घेवून महावितरणला सहकार्य करा. कृषिपंपधारक थकबाकीदार शेतकर्‍यांचे वीज बिल भरण्यासाठी 15 दिवसाची म्हणजेच 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे असे सरकारने जाहीर केले आहे. तर 15 नोव्हेंबरपर्यंत शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन खंडीत केले जाणार नाही. तसेच मुद्दल रकमेचे पाच हप्ते करण्यास आले असून हे पाच हप्ते डिसेंबर 2017 ते डिसेंबर 2018 ह्या कालावधीत शेतकर्‍यांनी भरावयाचे आहेत असे आमदारांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

शेतकर्‍यांना कर्जमाफी न दिल्याने, परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यानेे शेतकरी हवालदिल आहे. त्यातच महागडी खते व महागाई, भात खरेदी केंद्र सुरू नाहीत या सर्व कारणांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना कर्जमाफी व वीज बिल माफ करावे अशीही मागणी बरोरा यांनी केली. तसेच वीज बिल वसुलीचे व योजना जनजागृतीचे काम महावितरण कंपनीचे आणि त्यांच्या अधिकार्‍यांचे असत्तानाही विरोधी पक्षांच्या आमदारांनी वसुलीचे काम करावे हा अजब फतवा असल्याचे सांगून शेतकर्‍यांची वीज खंडित केल्यास तीव्र जनआंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.