वृक्षारोपण करुन त्याची जोपासना करणे काळाची गरज

0

धुळे । वृक्षारोपण करून प्रत्येकाने वृक्षाची जोपासना करणे ही काळाची गरज आहे मुलांवर लहान वयापासूनच वृक्षारोपण करण्याची आवड व महत्त्व समजले तर खर्‍या अर्थाने वृक्षारोपण मोहीम यशस्वी होऊ शकते असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती नूतन पाटील यांनी केले. शिंदखेडा तालुक्यातील हातनूर जिल्हा परिषद शाळेत नेहरू युवा केंद्र व लोकशक्ती विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य सतिष पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तर कार्यक्रमात शिवसेना जिल्हा प्रमुख हेमंत साळूखे, उपजिल्हा प्रमुख शाहनाभाऊ सोनवणे, पंचायत समिती सदस्य मनोहर देवरे, डिजिटल शाळेचे प्रणेते हर्षल विभांडीक, जिल्हा परिषद सदस्या शोभाताई पारधी, माजी जि. प.सदस्य वामन देसले, युवा सेना तालुका अध्यक्ष गिरीष पाटील, संस्था अध्यक्ष चंद्रकांत सोनार, लताताई पाटील, किशोर निकम आदी उपस्थित होते.

प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक रोपटे लावावे
सौ.पाटील म्हणाल्या की, वृक्षारोपण करून प्रत्येकाने वृक्षाची जोपासना करणे ही काळाची गरज आहे. वृक्ष नसतील तर पावसाबरोबरच अनेक समस्या उद्भवतील गेल्या काही वर्षात वृक्षतोड मोठया प्रमाणात झाल्याने त्याचा विपरीत परिणाम जनसामान्यांवर, येथील वातावरणावर झालेला दिसून येत आहे. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांने घराकडून एक रोपटे आणून लावणे गरजेचे आहे वृक्ष आपले सखेसोबती आहेत. आज मोठया प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने जमिनीची धूप होत आहे. अवेळी पावसाचे आगमन वातावरणातील प्राणवायू संपुष्टात येत आहे. भविष्यात अशीच परिस्थिती राहिल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. प्रत्येकाने वृक्षारोपण करणे ही काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखून रोपाची लागवड करून त्याचे संगोपन केले पाहिजे असे सौ.पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी जि. प. शाळेचे शिक्षक संदीप पाटील, विनोद गवळी, तुषार पाटील, कोमल पाटील, देवेन्द्र पाटील भूषण पाटील यांनी प्रयत्न केले.