वेताळवाडी किल्ल्यावरील दुर्लक्षित तोफेला तोफ गाड्यावर बसविणार

0

सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत आज लोकार्पण होणार

चाळीसगाव – सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे वेताळवाडी किल्ल्यावरील ऐतिहासिक दुर्लक्षित तोफ तोफ गाड्यावर बसवुन उद्या दि. २८ एप्रिल रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला शिवप्रेमी नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक गड-किल्ल्यावर आजही पराक्रमी मावळ्यांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा पावलोपावली पाहायला मिळतात याचाच एक भाग म्हणून सोयगाव तालुक्यातील वेताळवाडी किल्ल्यावर एक भव्यदिव्य अशी तोफ आजही एका कोपर्‍यात पडलेली पाहावयास मिळते. गेल्या अनेक वर्षापासून ही तोफ ऊन, वारा, पाऊस खात संवर्धनाच्या प्रतीक्षेत पडून होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून सह्याद्री प्रतिष्ठानच्या कन्नड विभागामार्फत या तोफेला तोफ गाडा बसवून तिला पुन्हा एकदा तिच्या मूळ जागेवर वैभवाने बसून लोकार्पण करण्याचे नियोजन केले आहे.

युरोपीय पध्दतीचा चार चाकी गाडा
लोकवर्गणीतून या तोफेसाठी युरोपीय पद्धतीचा सागवानी लाकडाचा बनवलेला चार चाकी तोफ गाडा उद्या दि. २८ एप्रिल रोजी वेताळवाडी किल्ल्यावर लोकार्पण केला जाईल या सोहळ्यासाठी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंड,े चाळीसगावचे उद्योगपती तथा सामाजिक कार्यकर्ते मंगेश चव्हाण हे प्रमुख म्हणून उपस्थित राहतील. तर सह्याद्री प्रतिष्ठानचे विविध विभागातील पदाधिकारी शिलेदार या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहणार असून गड किल्ले संवर्धन प्रेमींनी व शिवप्रेमींनी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान कन्नड व चाळीसगांव विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.