मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमी आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून राजकीय भाष्य करीत असतात. त्यांनी यावेळी आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले आहे. पुढचा मुख्यमंत्री मीच होणार, या वक्तव्यावरुन राज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कुंचल्यातून फटकारे चालवले आहेत. महाराष्ट्रात सध्या दुष्काळसदृश्य परिस्थीती असल्याचे राज यांनी आपल्या चित्रात दर्शवले आहे. तर मुख्यमंत्र्यांकडे वैचारिक दुष्काळ असल्याचे म्हटले आहे.
पुढचा मुख्यमंत्री मीच होणार, असे आत्मविश्वासपर विधान देवेंद्र फडणीवस यांनी केले होतं. राज यांनी फडणवीसांच्या या विधानाची खिल्ली उडवत, परंतु देवेंद्रजी पुन्हा लाट येईल असे वाटत नसल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांच्या मनात हा प्रश्न असल्याचे राज यांनी आपल्या कार्टुनच्या माध्यमातून दाखवले आहे.
आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांना लक्ष्य करणाऱ्या राज ठाकरेंनी आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 1 लाख 20 हजार विहिरी, हागणदारी मुक्त महाराष्ट्र, इतर थापा असं लिहिलेल्या कागदपत्रांवर फडणवीस पाय ठेवून झोपल्याचे या चित्रात दिसत आहे. विशेष म्हणजे, फडणवीस एका नावेत झोपले असून ती नाव कोरड्या जमिनीवर खोल पाण्यात बुडाल्याचे दिसून येते. या नावेवर महाराष्ट्र राज्यातील आर्थिक स्थिती असे लिहिले आहे. याचाच अर्थ, राज्याची आर्थिक स्थिही ही या बुडालेल्या नावेप्रमाणेच असल्याचे राज यांनी सूचवले आहे. तर बाजूलाच नावेला टेकून अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार उभारले आहेत. तसेच राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीवर भाष्य करताना, 201 तालुक्यात दुष्काळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.