व्होमक्वारंटाईन असतांना मास्क न लावता बाहेर फिरले ; चौघांवर गुन्हा दाखल

0

जळगाव – मुंबईहून दोन जणांना जळगावात आणले. यानंतर संबंधित चौघांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना होम क्वारंटाईन करण्याचे आदेश होते. असे असतांनाही होम क्वारंटाईन न राहता चौघेही मास्क न लावता विना कारण बाहेर फिरत असतांना आढळून आल्याने साहील पठाण वय 26, रा. ह.मु.समतानगर, मूळ रा.पाळधी,ता.धरणगाव, आदील नवाज खान (वय-24), सुमित बनसोडे व एक महिला सर्व रा.शिवमंदीर,समतानग या चार जणांविरोधात मंगळवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. होमक्वारंटाईन केलेल्या व्यक्तींवर दाखल झालेला हा जिल्ह्यातला पहिलाच गुन्हा आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कारवाई
जिल्ह्यात जे नागरिक बाहेर गावावरून आलेले आहेत व ज्यांच्या चौदा दिवसांचा होमक्वारंटाईनचा कालावधी संपलेला नाही. असे नागरिक बेकायदेशीर बाहेर फिरताना दिसल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश गोरक्ष गाडीलकर, अध्यक्ष, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती तथा इंन्सिडंन्ट कमांडर यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी याबाबत कारवाईचे आदेश अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके व पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांना दिल्या आहेत. या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली रामानंद नगर पोलीस ठाण्याचे सपोनि मनोजकुमार राठोड, पोकॉ अतुल पवार, पोना नरेंद्र पाटील हे गस्त घालत होते. गस्तीदरम्यान कर्मचार्‍यांना तीन ते चार जण तोंडाला मास्क न लावता विनाकारण फिरत असतांना दिसून आले.

भिवंडीहून महिलेसह एकाला आणले जळगावात
पोलिसांनी केलेल्या चौकशीत साहील पठाण आणि आदील खान यांनी 15 मे रोजी सुमित बनसोडे आणि एक महिला (नाव गाव पुर्ण माहित नाही) या दोघांना गोधवली ता. भिवंडी जि.ठाणे येथून शहरात आणल्याचे समोर आले. तसेच वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना होमक्वारंटाईनच्या सुचना असतांनाही ते विनाकारण मास्क न लावता फिरत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार चारही जणांवर मास्क न लावता काहीएक कारण नसताना बाहेर फिरताना मिळुन आले असता कोविड 19 संसर्गजन्य आजार प्रसरविण्याची हयगई व घातककृती केली म्हणून भादवि कलम 188, 269, 270 अन्वये रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.