नाशिक: भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास एसआयटीकडे देण्याच्या निर्णयावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद दिसून येत आहे. शरद पवार यांनी यावरून मुख्यमंत्र्यांवर नाराजी देखील बोलून दाखविली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज रविवारी नाशिक दौरा रद्द केला आहे. नाशिक दौरा रद्द करुन शरद पवार मुंबईकडे रवाना झाले आहेत. उद्या त्यांनी राष्ट्रवादीच्या १६ मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. तातडीने बैठक घेण्यामागील कारण काय असावे यावरून चर्चा सुरु झाली आहे.
राज्यातील वकिलांच्या परिषदेच्या समारोप कार्यक्रमासाठी शरद पवार नाशिकमध्ये येणार होते. सकाळी ११ वाजता ते राष्ट्रवादी भवनात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीदेखील घेणार होते. त्यामुळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने भवनात जमले होते. मात्र जळगावमधून खास हेलिकॉप्टरने ते नाशिक शहराजवळील आडगावमधल्या भुजबळ नॉलेज सिटीच्या हेलिपॅडवर आले. इथूनच ते हेलिकॉप्टरनं त्वरित मुंबईकडे रवाना झाले.
एल्गार प्रकरणाच्या तपासावरुन महाविकास आघाडी सरकारमधले मतभेद समोर येत असताना पवारांनी ही बैठक बोलावली आहे. राराज्य सरकारने एसआयटीच्या माध्यमातून एल्गार प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणी शरद पवार यांनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे केली होती.