शहरातील विजेचा होणारा लपंडाव बंद करा

0

विवेक नरवाडे : विद्युत वितरण कंपनीला निवेदन

भुसावळ : शहरातील यशोदा हॉटेलमागील माता यशोधरा नगर, गणपूर्ती नगर, खडका रोडवरील मोहम्मदी नगर या परीसरात गेल्या अनेक दिवसांपासून दररोज दिवसातून पाच ते सहा वेळा लाईट ये-जा करीत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. कधी-कधी वीज दाब अत्यंत कमी होत असल्याने विद्युत उपकरणांचे नुकसान होण्याची भीती आहे. वीज कंपनीने ही समस्या सोडवून सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी काँग्रेस अनु.जाती विभागातर्फे वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता घारुडे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

कमी-अधिक दाबामुळे उपकरणांचे नुकसान
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक योगेंद्र पाटील, जळगाव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, शहर उपाध्यक्ष तस्लीम खान, उपाध्यक्ष शैलेश अहिरे व दिलीप क्षिरसागर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, विजेच्या लपंडावामुळे या संपूर्ण परीसरातील नागरीकांच्या घरातील विद्युत उपकरणांवर विपरीत परीणाम झाला आहे. नागरीक अक्षरश: वैतागले आहेत. अगोदरच कोरोना या महामारीमुळे नागरीकांच्या मनात भीती असल्याने लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय, उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. नवीन वीज मिटरमुळे आधीच वीज बिल अव्वाच्या सव्वा येत असल्याने व त्यात वीजदाब कमी अधिक होत असल्याने नागरीकांच्या घरातील ट्युबलाईट, पंखे, टीव्ही, फ्रिज, इन्व्हर्टर आदी विद्युत उपकरणे बिघडत आहेत. सुरळीत वीजपुरवठा करून नागरीकांना त्रासातून मुक्त करावे अन्यथा लोकशाही मार्गाने जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जळगाव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांनी दिला आहे.