जळगाव– कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन शिथिल करण्यात आला असला तरी अत्यावश्याक सेवा, तसेच सेवेशी संबंधित आस्थापना तसेच वाहनांना परवानगी आहे. मात्र कुठलेही आदेश नसतांना विनाकारण प्रवासी वाहतूक करणार्या रिक्षांवर कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. अशाप्रकारे दोन दिवसात 100 पेक्षा रिक्षांवर शहर वाहतूक शाखेतर्फे कारवाई करण्यात आली आहे. तसेच या सर्व रिक्षा शहर वाहतूक शाखेत जमा करण्यात आल्या आहेत.
शहरातील विविध चौकांमध्ये कारवाई
लॉक डाऊन काळात प्रवाशी रिक्षात प्रवासी वाहतूक करण्यास बंदी आहे. या पार्श्वभूमिवर विनाकारण प्रवासी वाहतूक करुन गर्दी होण्यास कारणीभूत ठरणार्या तसेच जिल्हाधिकार्यांचे आदेशाचे उल्लंघन करणार्या वाहनांवर कारवाईसाठी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक देवीदास कुनगर यांच्या मार्गदर्शनाखाली दहा जणांचे फिरते पथक नेमण्यात आले आहे. या पथकासह पोलीस निरिक्षक दिवसभर शहरात गस्त घालीत असतात. यादरम्यान सुभाष चौक, कोर्ट चौक, ला.ना.चौक, स्वातंत्र्य चौक, पांडे डेअरी चौक या ठिकाणांहून प्रवासी वाहतूक करत असलेल्या रिक्षा आढळून आल्या. संबंधित रिक्षांवर कारवाई करुन अशा 100 पेक्षा जास्त रिक्षा वाहतूक शाखेत जमा करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शन घेवून संबंधित रिक्षाचालकांकडून दंड वसूल करावा, की गुन्हा दाखल करावा, याबाबत शहर वाहतूक शाखेचे कारवाई सुरु होती.
आरटीओ विभागातर्फेही 18 रिक्षांवर कारवाई
उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकातर्फे गुरुवारी शहरांत लॉक डाऊन परिस्थितीत प्रवासी वाहतूक करतांना 18 ऑटो रिक्षा आढळून आल्यात. त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करून सदर रिक्षा एस. टी. वर्क शॉप व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय येथे जमा करुन ठेवण्यात आल्या. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरिक्षक राठोड, सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक आव्हाड यांच्या पथकाने केली.