पुणे:- विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता जपून आणि निश्चित कार्यपद्धती ठरवून शाळा कशा व केव्हा सुरू करता येतील, याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठकीत सांगितले.
तसेच उपमुख्यमंत्री पवार यांनी टाळेबंदीमुळे विविध क्षेत्रांतील उद्योग, व्यवसाय यांचे नुकसान झाले आहे. उद्योगांना उभारी देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होत आहेत. रोजगार उपलब्धतेसाठी उद्योग, व्यवसाय सुरू करून स्थानिकांना रोजगारात प्राधान्य द्यावे. यासाठी शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत रोजगार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले.
ससून रुग्णालयासाठी मनुष्यबळ तसेच तातडीच्या साधनसामग्रीच्या दृष्टीने मंत्रालयस्तरावर असलेल्या प्रस्तावांना मंजुरी देऊ. राज्य शासनाचा आवश्यक निधी तातडीने देण्यात येईल, असेही त्यांनी या बैठकीत सांगितले.