राज्यस्तरीय शैक्षणिक मंथन 2020 वेबिनारच्या उद्घाटनप्रसंगी राज्य शिक्षण मंत्री बच्चू कडू
भुसावळ : ज्याप्रमाणे आपण धार्मिक उत्सव साजरे करतो त्याच पद्धतीने शैक्षणिक उत्सव देखील साजरे झाले पाहिजे. धार्मिक कामासाठी निधी जमा होतो तसा शैक्षणिक कामासाठीदेखील उभा राहिला पाहिजे. शैक्षणिक कार्य हे राष्ट्रीय कार्य समजले गेले पाहिजे. गरीब-श्रीमंत खाजगी शाळा-अनुदानित शाळा अशी विषमता सध्या निर्माण झाली आहे. विषमता दूर करण्याचा सध्या प्रयत्न असून शिक्षण चांगले दर्जेदार मिळावे यासाठी शिक्षण व्यवस्थेतील विषमता दूर झाली पाहिजे, असे प्रतिपादन राज्य शिक्षण मंत्री बच्चू कडू यांनी तीन दिवसीय राज्यस्तरीय शैक्षणिक मंथन 2020 वेबिनार चे उद्घाटन करताना केले.
यांची वेबिनारसाठी उपस्थिती
या वेबिनारसाठी भारताचे मॅथ गुरू बी.एन.राव, यशदाचे प्रशासकीय अधिकारी डॉ.बबन जोगदंड, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मंजूषा क्षीरसागर, अधिव्याख्याता डॉ.राजेंद्र महाजन, राजकोट येथील रामानुजन मॅथ क्लब चेअरमन चंद्रमौली जोशी, नेटवर्क, नवी दिल्लीचे खजिनदार किशोर राजे आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात बी.बी.जोगी यांनी तीन दिवसीय वेबिनारचे उद्दिष्ट सांगितले.
तंत्रज्ञानामुळे जीवनात बदल : डॉ.बबन जोगदंड
पहिल्या सत्रात शिक्षणाच्या बदलत्या भूमिका आणि माध्यमे या विषयावर ती डॉ.बबन जोगदंड बोलताना म्हणाले की भविष्यामध्ये मानवाच्या जीवनात तंत्रज्ञानामुळे खूप बदल होणार आहेत. या बदलांचा स्वीकार शिक्षकांनी देखील स्वीकार केला पाहिजे. समाजामध्ये तीन गोष्टी शाश्वत असणार आहेत पहिले मृत्यू दुसरा बदल आणि तिसरा शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानातील होणारे बदल स्वीकारणारे सक्षम विद्यार्थी तयार करण्यासाठी पंचसूत्रीचा वापर केला पाहिजे. यामध्ये चांगले बोलता येणे, मुलांना संगणकाचे ज्ञान असणे, इंग्रजी भाषेचे ज्ञान अवगत करणे, आत्मविश्वास निर्माण करणे आणि कष्ट, मेहनत घेण्याची तयारी असणे या पंचसूत्रीचा वापर झाला पाहिजे त्याचप्रमाणे मीडियाचादेखील वापर शिक्षणात झाला पाहिजे यामुळे बदलत्या शिक्षणाची कास आपल्या धरता येऊ शकते. भारताचे मॅथ गुरु डॉक्टर बी.एन.राव यांनी बोलताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञान व गणित विषयाची भीती असते ही भीती आपण प्रथमता काढली पाहिजे यासाठी सोप्या-सोप्या खेळांमधून गोष्टींमधून गणिताची आवड निर्माण झाली पाहिजे मग गणित हे विद्यार्थ्यांना हातावरचे खेळणे वाटू लागते आणि अशा पद्धतीने विद्यार्थ्यांमधील गणिताची भीती दूर करता येऊ शकते. सूत्रसंचालन सुनील वानखेडे तर आभार संदीप पाटील यांनी मानले.