मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्यासह शिखर बँक घोटाळ्याचे मोठे आरोप होते. मात्र दोन्हीही आरोपातून त्यांना क्लीन चीट देण्यात आले आहे. यापूर्वी सिंचन घोटाळ्यातून त्यांना क्लीन चीट देण्यात आले होते. दरम्यान आता त्यांना शिखर बँक घोटाळ्यातूनही क्लीन चीट मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँकेच्या २५ हजार कोटी रूपयांच्या कथित घोटाळ्या प्रकरणी अजित पवार यांच्यासह ६९ जणांना क्लीन चीट दिली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यायालयालयात क्लोजर अहवाल सादर करण्यात आला आहे.
२५ हजार कोटी रूपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशी अहवालात तत्कालिन संचालक मंडळावर ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर २०११ मध्ये रिझर्व्ह बँकेनं बर्खास्त केलेल्या संचालक मंडळात अजित पवार, हसन मुश्रीफ यांसह बड्या नेत्यांचा समावेश होता. या कथित घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांसह ७० जणांवर कलम ४२०, ५०६, ४०९, ४६५ आणि ४६७ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. यामध्ये शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ, भाजपात असलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांसह अन्य पक्षातील नेत्यांच्या नावाचा समावेश होता. महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.