शिक्रापूर । पारोडी ता. शिरूर या शिरूर तालुक्यातील अतिशय खेडेगावातील नवनाथ लक्ष्मण टेमगिरे हा पंचवीस वर्षीय तरुण युवक त्याच्या हलाकीच्या अशा
परिस्थितीशी झगडत कोणत्याही आधाराविना चित्रपट निर्माता बनत असून शिरूर तालुक्यातील तरुणांना एक नवा व वेगळा आदर्श असा संदेश देत आहे.
आधी सिनेमागृह उभारले
पारोडी ता. शिरूर येथील नवनाथ टेमगिरे या लहानपणी वडिलांचे छत्र हरपलेल्या युवकाने आपल्या भागात सिनेमागृह सुरु करण्याचा धाडसी निर्णय घेतला. जमिन विक्री करून सिनेमागृह सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यामाध्यमातून मिळालेल्या पैशातून नवनाथने शिक्रापुरात साध्या पद्धतीचे सिनेमागृह सुरु केले. सुरु करण्यात आलेले सिनेमागृह चांगले चालू लागले त्यामुळे नवनाथला त्या व्यवसायाचा अंदाज आल्याने चाकण येथे सिनेमागृह भाडेतत्वाने घेतले. त्यातून मिळालेल्या पैशातून नवनाथने 2016 साली स्वतःचे लग्न केले त्यावेळी त्याच्या आईने समाधान व्यक्त केले. परंतु लग्नानंतर नवनाथने चित्रपट बनविण्याचा निर्णय घेतला.
उद्योगपती उल्हास शेवाळेंचे सहकार्य
नवनाथची उरुळी देवाची येथील उद्योगपती उल्हास शेवाळे यांच्याशी ओळख झाली. त्यांनी चित्रपटामध्ये भागीदारी करण्याचे ठरविले. त्यामुळे चित्रपटाच्या पुढील कामाची सुरवात झाली. लवकरच नवनाथचा कॉलेज जीवनावर आधारित मुलामुलींना आई-वडील काय करून शिकवतात, आई वडिलांचे स्वप्न काय असते, मुले काय करतात तसेच मुलांनी काय करावे व कसे वागावे हे दाखविणारा चित्रपट जानेवारी ते फेब्रुवारी 2018 मध्ये सर्वांच्या भेटीला येणार आहे. पुढील काळामध्ये ग्रामीण भागातील मुलांना व्यासपीठ देण्यासाठी व कलाकार घडविण्याचे तसेच शिरूर तालुक्याचे नाव देशात झळकाविण्याचा नवनाथचा मानस आहे.
चित्रपटाचे चित्रीकरण सुरु
नवनाथच्या कॉलेजचे मित्र रुपेश बोरुडे, आयुब शेख, श्रीकांत धुमाळ, सचिन कांबळे, विक्रम दुपारकुडे, प्रवीण बामणे या सर्वांनी मिळून एखादा चित्रपट स्वतः तयार करण्याचा निर्णय घेतला. सर्वांनी मिळून चित्रपटाची कहाणी तयार केली व स्वतः कलाकार म्हणून काम करायचे ठरवले. परंतु त्यासाठी लागणारा पैसा ही सर्वात मोठी अडचण उभी राहिली. त्यावेळी सिनेमागृहातून मिळालेले काही पैसे शिल्लक होते. परंतु तेवढ्या पैशातून काम होणार नव्हते. खूप विचार करून सिनेमागृह विक्री करून त्यामाध्यमातून पैसा चित्रपटासाठी वापरण्याचा निर्णय घेतला. चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले सयाजी शिंदे, भारत गणेशपुरे, सुनील गोडबोले, मधु कुलकर्णी, दिपक शिर्के या कलाकारांनाही घेण्यात आले. चित्रीकरणानंतर नवनाथ जवळ असलेले पैसे संपून गेले. चित्रीकरण बंद पडण्याची वेळ आली. चित्रीकरण बंद झाले. परंतु, नवनाथ स्वस्थ बसत नव्हता.