मुंबई । शहरात नाही तर ग्रामीण भागात वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या परिवहन विभागाने सुरु केलेली शिवग्रामीण टॅक्सी योजना ही अत्यंत महत्वाची योजना आहे. याशिवाय परिवहन विभागामार्फत खास महिलांसाठी सुरु होत असलेली अबोली रंगाची रिक्षासुद्धा महत्वाची ठरणार आहे. या रिक्षाच्या चालक ह्या महिलाच असल्याने त्यात प्रवास करणार्या महिला प्रवाशांना सुरक्षिततेची हमी मिळणार आहे. त्याचबरोबरच महिला रिक्षा चालकांना हक्काचा रोजगारही उपलब्ध होणार आहे. परिवहन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या अशा विविध योजना कौतुकास्पद असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.
ग्रामीण भागात सुरक्षित सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देणे व मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याच्या उद्देशाने आज शिवग्रामीण टॅक्सी योजनेचा शुभारंभ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आला.या टॅक्सींमुळे लोकांचा प्रवास सुरक्षित होण्याबरोबरच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होणार आहे. शिवाय, शिवग्रामीण टॅक्सीमधील प्रवास आरामदायी असून त्याचा प्रवाशांना मोठा लाभ होईल, असा विश्वास परिवहन मंत्री दिवाकर रायते यांनी व्यक्त केला. वांद्रे येथील कलानगर जंक्शन येथे झालेल्या या कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरुपात काही जणांना नव्या शिवग्रामीण टॅक्सीच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या.याप्रसंगी राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, आमदार अनिल परब, तृप्ती सावंत, भरत गोगावले, परिवहन आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांच्यासह विविध रिक्षा, टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महिलांकरिता रिक्षा परवान्यांमध्ये 5 टक्के आरक्षण
महिलांकरीता रिक्षा परवान्यांमध्ये 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णयही परिवहन विभागाने घेतला असून या योजनेचा उद्या ठाणे येथे शुभारंभ करण्यात येत असल्याची घोषणा मंत्री दिवाकर रावते यांनी यावेळी केली. अबोली रंगाच्या असलेल्या या रिक्षा महिलांची सुरक्षितता आणि त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने महत्वाच्या असून उद्या प्रातिनिधीक स्वरुपात 50 महिलांना त्या प्रदान करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.