नाशिक । नाशिकमध्ये सुरू असलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यातल्या एका भाषणाची सुरुवात आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या अस्थींना श्रद्धांजली वाहून करण्यात आली.
आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या एका नातेवाइकाने या अस्थी मंचावर आणल्या आणि यानंतर संपूर्ण सभागृह उभे राहिले. अतिशय भावुक वातावरणात या शेतकर्याच्या अस्थींसमोर श्रद्धांजली वाहण्यात आली. हा प्रसंग इतका भावुक होता की, उभ्या असलेल्यापैकी अनेकांचे डोळे पाणावले. यानंतर शेतकर्याच्या नातेवाइकांनी सत्ताधार्यांना खडेबोल सुनावले. यावेळी सटाण्यातील आत्महत्या केलेल्या शेतकर्याची पत्नी कल्याणी ठाकरे यांनीही आपलं मत मांडलं. बाळ 9 महिन्यांचे असताना नवर्याने आत्महत्या केली. 55 वर्षांची सासू कॅन्सरग्रस्त आहे. 15 लाखाचं कर्ज असताना एकट्याने आयुष्याचा संघर्ष करतेय असं कल्याणी ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं, तर आणखी एका शेतकर्याच्या मुलीने, आमच्या कन्यादानापर्यंत आमचा बाप जिवंत राहू द्या, आम्ही शाही लग्न लावायला आणि आलिशान इमारती बांधायला कर्जमाफी मागत नाही, असं म्हणत कर्जमाफीची मागणी केली. शिवसेनेने नाशिकमध्ये मेळावा घेऊन समृद्धी महामार्गाला तीव्र विरोध केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा शेतकरी मेळावा भरवण्यात आला आहे. या मेळाव्याला सेनेच्या मंत्र्यांसह सेनेचे खासदार उपस्थित आहेत. यावेळी उपस्थित शेतकर्यांनी समृद्धी महामार्ग रद्द झालाच पाहिजे, या आशयाच्या टोप्या घातल्या आहेत, तर सरकारच्या निर्णयाविरोधात बॅनरही लावण्यात आले आहेत.
ग्रामविकासमंत्री दादा भुसे यांनी प्रास्ताविक करताना शिवसेनेच्या केंद्रस्थानी शेतकरी असल्याचे सांगितले. शेतकरी आत्महत्या दुख:द असून, त्यावर कर्जमुक्तीचाच पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही कर्जमाफीची गरज असल्याचे ते म्हणाले. ग्रामविकासमंत्री दादा भुसे, खासदार संजय राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विजय शिवतारे व शेतकरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अधिवेशनाला सुरुवात करण्यात आली.