शिवसेनेने केला महागाईच्या भस्मासुराचा वध!

0

पिंपरी चौकात लक्षवेधी आंदोलन, भाजप सरकारचा नोंदविला निषेध

पिंपरी-चिंचवड : पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेतर्फे शनिवारी वाढत्या महागाईच्या भस्मासूराचा वध करण्यात आला. तसेच महागाई कमी करण्याची सरकारला सद्बुद्धी देण्याचे साकडे देवीला घालण्यात आले. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात हे लक्षवेधी आंदोलन झाले. ’अच्छे दिनची लई घाई, कमी झाली नाही महागाई’, ’महागाई वाढविणार्‍या भाजप सरकारचा धिक्कार असो’, अशा सरकारच्या विरोधात तीव्र घोषणा देण्यात आल्या.

यांनी नोंदविला आंदोलनात सहभाग
या आंदोलनात खासदार श्रीरंग बारणे, आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख राहुल कलाटे, महिला शहर संघटिका सुलभा उबाळे, नगरसेविका मीनल यादव, रेखा दर्शिले, शारदा बाबर, नगरसेवक अमित गावडे, माजी नगरसेवक मारुती भापकर, प्रकाश बाबर, मधुकर बाबर, विनायक रणसुभे, सल्लागार भगवान वाल्हेकर, पिंपरी युवासेना अधिकारी सचिन सानप, चिंचवड युवासेना अधिकारी राकेश वाकुर्डे, अमित शिंदे, नीलेश मुटके, गजाजन चिंचवडे, सुखदेव नरळे, योगेश बाबर, युवराज दाखले सहभागी झाले होते.

सरकारला जागा दाखवू
यावेळी खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. महागाई गगनाला भिडली असून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. जनता त्रस्त झाली आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे. किती शेतकर्‍यांना कर्जमाफी झाली, हे सरकार सांगत नाही. देशाचा विकासदर कमी झाला आहे. भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. शिवसेना जनतेसोबत आहे. सर्वसामान्य जनतेला महागाईचे चटके देणार्‍या सरकारला शिवसेना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खासदार बारणे यांनी दिला.

सर्वच आघाड्यांवर सरकार अपयशी
आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार म्हणाले, तीन वर्षांत सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. पेट्रोल, डिझेलच्या किमतीत भरमसाठ दरवाढ झाली आहे. भाजपने जनतेला भरमसाठ आश्वासने दिली होती. मात्र, त्याची पूर्तता होताना दिसत नाही, असे अ‍ॅड. चाबुकस्वार यांनी सांगितले. शहरप्रमुख राहुल कलाटे म्हणाले, भाजपने अच्छे दिनाचे आश्वासन दिले होते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने भाजपला सत्तेवर बसविले. मात्र तीन वर्षांत भाजपचे खरे रूप उघड झाले आहे. सुलभा उबाळे म्हणाल्या, अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणारे भाजप सरकार सर्वसामान्य जनतेची लूट करत आहे. सरकारच्या विरोधात बोलणार्‍याचा आवाज दाबला जात असून, सरकारची धिक्कारशाहीकडे वाटचाल सुरू आहे, हे निषेधार्ह असल्याने उबाळे म्हणाल्या.