मुंबई-अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या स्मारकाविरोधात करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी करताना शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती देण्यास नकार देत उच्च न्यायालयाने या याचिका फेटाळून लावल्या आहेत. राज्यात दुष्काळ आणि इतर समस्या असतानाही राज्य सरकार शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकावर अवाढव्य खर्च करू नये यासाठी याचिका दाखल केली होती.
या सर्व याचिकांवर आज एकत्र सुनावणी घेण्यात आली. या सर्व याचिकांची सुनावणी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर झाली. अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकामुळे 16 हजार मच्छीमार बांधवांच्या व्यवसायावर परिणाम होणार असल्याचा दावा एका याचिककर्त्यांने केला होता. तर दुस-या एका याचिकेत सरकारनं जनसुनावणी घ्यावी, अन्यथा अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचे स्मारकाचे काम थांबवावे, अशी मागणी करण्यात आली होती.
परंतु या प्रकल्पासाठी जनसुनावणी घेण्याची गरज नसल्याचे मत न्यायालयाने मांडले आहे. तसेच या प्रकल्पासाठी सर्व आवश्यक परवानग्या मिळवल्या असल्याचेही विशेष सरकारी वकील अॅड. थोरात यांनी न्यायालयाला सांगितले आहे.