तळोदा: जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अडावद येथील नवरदेवाने स्वतः मोटार सायकलीवर बोरद येथे येऊन शुभमंगल आटोपून नवरी मुलीला डबलसीट आपल्या घरी नेले. अत्यंत साध्या पद्धतीने उरकलेल्या विवाहाची सर्वत्र चर्चा आहे.
बोरद येथील शिंपी समाजाचे नेते व भाजपाचे कार्यकर्ते किशोर जाधव यांची कन्या मयूरी किशोर जाधव हिचा विवाह चोपडा तालुक्यातील अडावद येथील भास्कर महारु बिरारे यांचे चिरंजीव महेश भास्कर बिरारे याच्याशी 2 मे रोजी घटीक मुहूर्तावर आयोजित केला होता. 23 मार्चपासून देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यामुळे राज्य बंदीसह जिल्हाबंदी आहे. कलम 144 नुसार 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे.
लग्न समारंभासाठी शासनाने नियमावली तयार केली आहे. लग्नसाठी वधु-वरकडील चार-चार व्यक्तिंना लग्नात सहभागी होण्यास परवानगी आहे. त्यातही प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक असून स्थानिक सरपंच , ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत लग्न लावले जातील, असे निर्देश आहेत.परंतु अडावद येथील महेश बिरारे यांनी गावाच्या परवानगीने एकटेच मोटारसायकलवर येऊन लग्न समारंभ आटोपुन घेतला. लग्नानंतर मोटरसाईकलवर बसवून तो वधुला घेऊनही गेला.
विवाहाला अकरा जणांची उपस्थिती
बोरद येथील पुण्यपावन मंदिरात येथील सरपंच वासंतीबाई ठाकरे यांच्या उपस्थितीत 2 मे रोजी सकाळी 11 वाजता हा विवाह पार पडला. यावेळी सामाजिक अंतर ठेवण्यात आले. वधु-वरांसह उपस्थित वर्हाडी मंडळींनी तोंडाला मास्क लाऊन शासनाच्या आदेशाचे पालन केले. यावेळी ब्राह्मण, न्हावी, मुलीचे आई,वडील, काका, काकू,आजोबा, पं.स.सदस्य विजयसिंह राणा असे 11 लोक उपस्थित होते. लग्नानंतर 11 जणांनी जेवण केले.त्यामुळे बोरद गावाच्या इतिहासात प्रथमच असा विवाह पार पडल्याची दिवसभर चर्चा सुरु होती.