शेतकर्‍यांचा संयम संपला!

0

नवी दिल्ली।  दिल्लीतील जंतरमंतरवर महिनाभरापासून आंदोलन करणार्‍या तामिळनाडूतील शेतकर्‍यांच्या संयमाचा बांध फुटला आहे. दुष्काळामुळे पीक जळाल्याने कर्जमाफी आणि आर्थिक मदत मिळावी, अशी या शेतकर्‍यांची मागणी आहे. पण अनेक मार्गांनी आंदोलन करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांनी शनिवारी सरकारचा निषेध करण्यासाठी मूत्रप्राशन केले. सरकारने दखल न घेतल्यास उद्या, रविवारी मानवी मैला खाण्याचीही धमकी दिली आहे.

दिल्लीतील जंतरमंतरवर महिनाभरापासून आंदोलन आहे सुरू
दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी 40 हजार कोटींची मदत जाहीर करावी, या मागणीसाठी तामिळनाडूतील शेतकर्‍यांचे दिल्लीतील जंतरमंतरवर महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे. सरकारने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी पॅकेज जाहीर करावे, कर्जमाफी आणि आर्थिक मदत द्यावी, अशी या शेतकर्‍यांची मागणी आहे. महिनाभरापासून या शेतकर्‍यांनी विविध मार्गांनी आंदोलन केले. काही दिवसांपूर्वी जंतर मंतर येथे आंदोलनाला बसलेल्या तामिळनाडूतील शेतकर्‍यांपैकी सात जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी पंतप्रधान कार्यालयात नेण्यात आले होते. पण पंतप्रधान मोदींच्या व्यस्त वेळापत्रकामुळे शेतकर्‍यांचे शिष्टमंडळ आणि पंतप्रधानांची भेट होऊ शकली नाही. अखेर पंतप्रधान कार्यालयातील अधिकार्‍यांना निवेदन देऊन शिष्टमंडळाला माघारी फिरावे लागले होते.

पोलिसांच्या वाहनातून या सर्वांना आंदोलनाच्या ठिकाणी घेऊन जात होते. त्याचवेळी एका शेतकर्‍याने वाहनातून उडी मारली आणि आपल्या अंगावरील कपडे काढून तो रस्त्यावर पळू लागला. आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशा घोषणाही त्यांनी दिल्या होत्या.

उंदीर खाऊनही दर्शवला होता निषेध
या शेतकर्‍यांनी यापूर्वी आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांचे सांगाडे आणून आंदोलन केले होते. तर उंदीर खाऊनही या शेतकर्‍यांनी सरकारच्या दिरंगाईचा निषेध दर्शवला होता. आतापर्यंत विविध मार्गांनी आंदोलन करूनही पदरी निराशा पडलेल्या शेतकर्‍यांनी आक्रमक रूप धारण केले आहे. आज जंतरमंतरवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांनी सोबत बाटल्यांमध्ये मूत्र आणले होते. सरकारच्या निषेध नोंदवण्यासाठी त्यांनी मूत्रप्राशन केले. सरकारने दखल न घेतल्यास उद्या, रविवारी मानवी मैला खाण्याची धमकी दिली आहे.