मुंबई | शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज भरून होईपर्यंत केंद्रे सुरू ठेवण्याच्या घोषणेवरून घूमजाव करत राज्य सरकारने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आता १५ सप्टेंबरची मुदत निश्चित केली आहे.
राज्य सरकारने नेमलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीने मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा केली. राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दीड लाख रूपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आहे. दीड लाखांपुढील शेतकऱ्यांसाठी एकरकमी परतफेड योजनेचा लाभ दिला जाणार आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांसाठी २५ हजार रूपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. या योजनेत कर्ज पुर्नगठीत झालेल्या शेतकऱ्यांनाही लाभ दिला जाणार आहे.
या कर्जमाफीचे लाभ देण्यासाठी शेतकऱ्यांची माहिती ऑनलाईन अर्जाद्वारे घेतली जात आहे. ऑनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी २६ हजार केंद्रांवर सुविधा उपलब्ध आहे. आपले सरकार सेवा केंद्र, नागरिक सुविधा केंद्र, संग्राम आणि काही ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचा समावेश आहे. कर्जमाफीचे हे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना फारच कमी कालावधी राहिला असल्यामुळे या मुदतीत उर्वरीत शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज भरणे अशक्य होते. यासंदर्भात नंतर राज्य सरकारने सर्व लाभार्थी शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज भरून होईपर्यंत केंद्रे सुरु ठेवणार असल्याची घोषणा केली होती. आता मात्र, सरकारने १५ सप्टेंबरपर्यंत हे अर्ज मिळावेत, असे फर्मान काढले आहे.
राज्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांना ई सेवा केंद्रांमध्ये विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक केंद्रे बंद अवस्थेत आहेत. विशेषतः इंटरनेटचा वेग आणि इतर बाबी अडचणीच्या ठरत आहेत. त्यावर मात करण्यासाठी राज्याच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाला समितीने निर्देश दिले आहेत. दोष दुरूस्त करून लवकरात लवकर राज्यातील सर्व ई सेवा केंद्रे सुरू होतील असे पाहण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. राज्य सरकारच्या दाव्यानुसार राज्यात ९० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. २१ ऑगस्टअखेर २१ लाख ५७ हजार ३४४ शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून १७ लाख ९५ हजार १०४ शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज भरून झाले आहेत. राज्यात सध्या एकेका दिवसात एक ते सव्वा लाख शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज भरून होत आहेत, असेही सूत्रांनी सांगितले.