सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आवाहन
मुंबई :- कर्जमाफीच्या प्रलंबित प्रकरणाबाबत पात्र शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधावा असे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र अर्जदार शेतकऱ्यांना बँकांकडील माहितीच्या आधारे कर्जमाफीचा, प्रोत्साहनपर लाभाचा फायदा देण्यात आला आहे. काही शेतकऱ्यांनी त्यांच्या अर्जात दिलेली कर्जाची माहिती ही बँकेकडून प्राप्त झालेल्या कर्ज खात्यांच्या माहितीशी जुळत नसल्याने अशा शेतकऱ्यांना लाभ मिळू शकला नाही. अर्जदार शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीची शहानिशा करुन पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देता यावा म्हणून शासनाने तालुकास्तरीय समिती नियुक्त केली असल्याचे देशमुख यांनी जनशक्तिशी बोलताना सांगितले.
देशमुख म्हणाले की, अशा शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँकेत व शाखांमध्ये उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. कर्जमाफी योजनेचा लाभ प्रलंबित असलेल्या अर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याची अचूक माहिती आपल्या बँकेच्या शाखेत तातडीने सादर करावी. शेतकऱ्यांसंबंधी माहितीची शहानिशा करुन त्यामध्ये आवश्यक ती दुरुस्ती बँकेमार्फत करण्यात येईल. त्यानंतर तालुकास्तरीय समिती मार्फत तपासणीनंतर ही माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात येऊन योजनेंतर्गत लाभ देण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. सर्व संबंधित शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधण्याचे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.