मुंबई : शंभर टक्के शेतीवर उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या शेतकर्यांनाच कर्जमाफी लाभ मिळणार आहे. शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी 15 जिल्ह्यात चार हजार कोटीचे प्रकल्प उभारणार आहोत, अशी माहिती मी मुख्यमंत्री बोलतोय कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच कर्जमाफी संदर्भात राज्यातील शेतकर्यांनी विचारलेल्या प्रश्नांना या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी उत्तरे दिली.
15 जिल्ह्यात 4 हजार कोटींचे प्रकल्प
मुख्यमंत्री म्हणाले की, ज्यांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे, अशांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे या कर्जमाफीनंतर नव्याने पीक कर्ज घेणार्यासाठी सवलतीच्या दरात ते उपलब्ध करुन देऊ. कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्यात येणार असून शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी 15 जिल्ह्यांत चार हजार कोटीचा प्रकल्प उभारणार आहोत. तसेच यांत्रिकीकरणातून उत्पादनवाढीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे क्लस्टर ही तयार करण्यात येणार आहे.
कडक उपाययोजनांचा पुनरूच्चार
या कार्यक्रमाचा पहिला भाग गेल्या रविवारी प्रसारित झाला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल भूमिका स्पष्ट केली होती. शेतकर्यांच्या ऐतिहासिक कर्जमाफीने 36 लाख शेतकर्यांचा सातबारा कोरा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती. तसेच कर्जमाफीचा गैरफायदा रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्याचेही सांगितले होते. याचाच पुनरुच्चार त्यांनी केला.