शेतीसाठी रोहित्र सौर उर्जेवर आणणार : मुख्यमंत्री फडणवीस

0

अमरावती : राज्यातील शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्यासाठी वीज आणि पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणे महत्वाचे बाबी आहेत. राज्य शासनाने या दोन्ही बाबींच्या पुर्ततेसाठी प्राधान्य दिले आहे. राज्यातील अपुर्ण सिंचन प्रकल्प पुर्ण करण्याबरोबरच शेतकर्‍यांना दिवसा 12 तास अखंडित वीज उपलब्ध करुन देण्याचे कार्य शासन करीत आहे. सौरउर्जेवर आधारीत कृषी पंप दिल्यानंतर आता शासन सौर उर्जेवर आधारीत रोहित्रेच आणत आहे. या संदर्भातील पायलट प्रकल्प सुरु झाला असून तो यशस्वी होत आहे. यामधून पुरेपूर वीज मिळणार असल्यामुळे शेतकरी समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी 29 डिसेंबर रोजी जैन फार्मफ्रेश हिन्दूस्तान कोकाकोला कंपनीच्या संत्रा उन्नती प्रकल्पाच्या भूमिपूजन वेळी व्यक्त केला. अमरावती येथून जवळच असलेल्या हिवरखेड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

भूमिपूजनप्रसंगी मान्यवरांची उपस्थिती
कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरिष महाजन, पालकमंत्री प्रविण पोटे पाटील, गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, आमदार डॉ.अनिल बोंडे, आमदार रमेश बुंदिले, आमदार आशिष देशमुख, जैन इरिगेशन कंपनीचे उपाध्यक्ष अनिल जैन, कोकोकोला कंपनीचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेंदर कॅन्थ, जैन इरिगेशनचे विपणन प्रमुख अभय जैन, जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलिस अधिक्षक लखमी गौतम, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल कुळकर्णी, मोर्शीच्या नगराध्यक्षा शिलाताई रोडे, सरंपच अमृते, जैन कंपनीचे कार्यकारी संचालक सुनिल देशपांडे आदी.

राज्यातील महत्वाकांक्षी तीन प्रकल्पाचे सामंजस्य करार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या संत्रा प्रकल्पाचा सामंजस्य करार झालेला असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई येथील मेक इन इंडिया विक या कार्यक्रमात राज्यातील महत्वाकांक्षी तीन प्रकल्पाचे सामंजस्य करार करण्यात आले होते. त्यापैकी मोर्शीतील संत्रा प्रक्रिया प्रकल्पाचे प्रत्यक्ष भूमिपूजन करुन आम्ही वचनपुर्ती केली आहे. जैन इरिगेशनने देशात शेती क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे. जगात 100 पेक्षा अधिक देशात अनिल जैन यांचे शेती क्षेत्रातील कार्य उल्लेखनिय आहे. कृषि प्रक्रिया उद्योग नसल्यामुळे बाजारपेठ शेतकर्‍यांच्या हातात नाही, परिणामी नैसर्गिक आपत्ती आणि विपणन होत असलेल्या देशांमधील स्थानिक कारणांमुळे शेतमालाचे भाव पडतात. शासनाने कृषि प्रक्रिया उद्योग वाढवण्यावर भर दिला आहे. कृषि प्रक्रिया उद्योगांच्या निर्मितीमुळे बाजारपेठ शेतकर्‍यांच्या हातात आहे, याचा आर्थिक लाभ शेतकर्‍यांनाचा मिळणार आहे.

प्रकल्पाचा 50 हजार शेतकर्‍यांना लाभ
संत्रा प्रक्रिया उद्योगामुळे कोकाकोला व जैन फार्मफ्रेश कंपनी संत्रा प्रक्रिया उत्पादनात ब्राझिल व अमेरिकेतून आयात करावा लागणारा गर आता आपल्या मोर्शीत निर्माण होणार आहे. त्यामुळे मोर्शीच्या संत्र्यांचा गर जगभरात या कंपनीच्या माध्यमातून पोहचणार आहे. या उत्पादनाला 100 टक्के देशी स्वरुप प्राप्त होईल. या उत्पादनाची विक्री कोकाकोला जगभरात करेल. या प्रकल्पामुळे शेतकर्‍यांना बाजारपेठ मिळणार असुन ती दलालांच्या हातात न राहता शेतकर्‍यांच्या हातात राहणार आहे. विदर्भातील अनुशेष तीन वर्षात पुर्ण करण्यासाठी अपुर्ण सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आहे. कृषि मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कृषि क्षेत्रात अमुलाग्र क्रांती करण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. अनिल जैन यांनी प्रकल्पा मागची भूमिका स्पष्ट करीत शेतकर्‍यांना होणारे लाभ समजून सांगितले.