पुणे । शोषण मुक्त समाजाची निर्मिती हेच संविधानाचे मुख्य उद्दीष्ट आहे. गरीब-श्रीमंत अशी दरी नष्ट करणे, भारताला खर्या अर्थाने सार्वबहुमत्व, सामाजिक धर्म निरपेक्ष बनविणे हे देखिल संविधानाचे उद्दीष्ट आहे. सदर उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी संविधान प्रथम समजून ते आचरणात आणले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी केले. ए.के.के.न्यु लॉ अॅकॅडमीच्या वतीने शनिवारी ‘संविधान दिवस’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
संविधान देशाचा आत्मा
संविधान देशाचा आत्मा आहे. संविधानाचे महत्व समजण्यासाठी आणि याबाबत जागरूकता करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असे डॉ. रशिद शेख यांनी सांगितले. या कार्यक्रांचे प्रास्ताविक शेख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेसिन्टा बॅस्टियन तर डॉ. मोरेश्वर कोठावदे यांनी आभार मानले.
जीवन समृद्ध करा
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. होते. आबेदा इनामदार, लतिफ मगदूम, डॉ. रशिद शेख, प्रा. मुजफ्फर शेख, डॉ. मोरेश्वर कोठावदे याप्रसंगी उपस्थित होते. संविधान ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व भारतीयांना दिलेली बहुमोल देणगी आहे. प्रत्येक भारतीयाने चांगले शिक्षण घेऊन संविधानाचा अभ्यास करून आपले जीवन समृद्ध व परिपूर्ण बनविले पाहिजे, असे डॉ. पी. ए. इनामदार यांनी यावेळी सांगितले.