फैजपूर : शहरातील श्रीकृष्ण कॉलनी भागातील रहिवाशांनी बुधवारी पालिकेत गटारीचे घाण पाणी आणून पालिकेत फेकून अनोखे आंदोलन केले. बुधवार, 22 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता श्रीकृष्ण कॉनीतील रहिवाशांनी पालिकेत गटारीचे पाणी आणून फेकले. गेल्या सहा वर्षांपासून या भागात सांडपण्याचा निचरा होत नसल्याने घाण पाणी बाहेर डबक्यात साचत आहे. श्रीकृष्ण भागात गटारींची समस्या अधिक दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक प्रकारची निवेदने पालिका प्रशासनाला दिली असलीतरी कोणतीही कारवाई पालिका प्रशासनाकडून आतापर्यंत करण्यात आलेली नाही. रहिवाशांच्या घरातील सांडपाण्याचा निचरा गटारीत होत नसल्याने या भागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार पालिकेला निवेदन देऊन पालिका जाणीवपूर्वक या श्रीकृष्ण भागाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला तसेच येणार्या निवडणुकीत नगरसेवकांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय सर्व श्रीकृष्ण कॉलनी परीसरातील नागरिक स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही नागरीकांनी दिला आहे. पालिकेने 15 दिवसांत गटारीचे काम सुरू केले नाही तर पुन्हा यापेक्षा तीव्र आंदोलन करणारा असल्याचा इशारा नागरीकांनी दिला आहे.