अहमदनगर : श्रीरामपूर तालुक्यातील नाऊरजवळच राहत असलेल्या एका महिलेने तरुणाच्या मदतीने पतीचा खून केला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात या दोघांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल पोलिसांनी या दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी या दोघांनाही सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. नाऊर येथील नंदू दामू पवार यांची शेती होती त्यांनी ही शेती शिरसगाव येथील अकबर शहाबुद्दीन शेख यास करण्यास दिली होती. अकबर शहाबुद्दीन शेख व रंजना नंदू पवार यांच्यात मैत्रीचे संबंध जुळू लागले. ही बाब नंदू पवार यांना खटकत असल्यामुळे यातून नेहमीच वाद होत असत.
याबाबतची माहिती कळताच पोलीस निरीक्षक श्री. पथवे व त्यांचे पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांना झालेला प्रकार समजताच त्यांनी तातडीने पोलिसांना पाठवून रंजना पवार व अकबर शेख या दोघांना शिताफीने अटक केली. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून उलट सुलट चर्चा सुरु आहे
मारहाणीत नवरा जागीच ठार
रंजना व नंदू या पती-पत्नीचे नेहमी भांडण होत असे, रंजना ही अकबर शेख सोबत ब्राम्हणगाव वेताळ या ठिकाणी गेल्या पाच सहा वर्षापासून स्वतंत्रपणे राहु लागली. यामुळे रंजना व नंदू यांच्यातील वाद विकोपाला गेला. याचा राग येवून रंजना हिने अकबरला बरोबर घेवून नाऊर येथे नंदूच्या घरी जावून त्याच्या पाठिवर व छातीवर, हातावर तसेच पायावर लाकडी दांडका, लोखंडी फुकणीने जबर मारहाण केली या मारहाणीत नंदू जागीच ठार झाला.