कोलंबो: जगभरात आज ईस्टर संडे साजरा होत असताना, श्रीलंकेची राजधानी कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरली आहे. राजधानी कोलंबो शहरांमध्ये एकापाठोपाठ अनेक बॉम्बस्फोट झाले आहेत. तीन चर्च आणि तीन हॉटेलमध्ये लागोपाठ ८ स्फोट झाले आहेत. या स्फोटांमध्ये मृत्यूचा आकडा १०० वर पोहचला आहे. मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर ३०० जण जखमी झाले आहेत. सकाळी ८.३० च्या सुमारास ही घटना घडली घडली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकन नागरिकांबाबत संवेदना व्यक्त केली आहे. भारत या घटनेचा निषेध व्यक्त करीत श्रीलंकन नागरिकांच्या दुखात सहभागी असल्याचे सांगितले आहे.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी देखील परिस्थितीची माहिती घेत मदतीचे आश्वासन दिले आहे.
कोलंबो शहरातील चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. यामध्ये अनेक निरापराध नागरिकांचा बळी गेला आहे. यामध्ये विदेशी पर्यटकांचा समावेशही आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार बट्टीकलोआ, कोच्छिकाडे आणि काटुवापिटिया येथील चर्चमध्ये स्फोट झाले आहेत. बट्टीकलोआ येथील चर्चमध्ये स्फोट झाल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, कोणत्याही दहशतवादी संघटनेने अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही.