श्रीलंकेवर मात करत भारत तिसऱ्यांदा आशिया कपचा किंग

0

कोलंबो : आशिया अंडर-१९ कपच्या अंतिम सामन्यात भारताच्या अंडर-१९ क्रिकेट संघाने श्रीलंकेवर ३४ धावांनी विजय मिळवत आशिया कपचे विजेतेपद पटकावले. विजयी संघावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार अभिषेक शर्माने अष्टपैलू कामगिरी केली. त्याच्या कामगिरीच्या जोरावर भारताला या सामन्यात यश मिळवता आले. भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ८ बाद २७३ धावा केल्या. भारताच्या या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ २३९ धावांवर गारद झाला. भारताकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक ३७ धावांमध्ये ४ विकेट घेतल्या. कर्णधार अभिषेक शर्माला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तर हिमांशू राणाला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

श्रीलंकेचा डाव 239 धावांतच संपुष्टात
फलंदाज आणि गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर भारताच्या युवा संघाने श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपदाची हॅट्ट्रिक केली. भारताने यापूर्वी 2012 आणि 2004 मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. भारतीय संघाच्या 274 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 48.4 षटकांत 239 धावांतच संपुष्टात आला. श्रीलंकेने 3 षटकांतच 27 धावा करताना जोरात सुरवात केली होती. पण, चौथ्या षटकांत त्यांनी विश्‍वा चतुरंगा याची विकेट गमाविली. त्यानंतर त्यांचा जोश ओसरला. रिवन केली आणि हसिथा बोयागोडा यांनी श्रीलंकेला 10 षटकांत 1 बाद 79 पर्यंत नेऊन ठेवले. मात्र, फिरकी गोलंदाजी सुरू झाल्यावर धावांची गती वाढवण्याच्या नादात बोयागोडा (37) बाद झाला. तेव्हा 19 षटकांत त्यांची स्थिती 2 बाद 105 अशी झाली होती. त्यानंतरही केलीने कर्णधार कमिंडू मेंडिसच्या साथीत श्रीलंकेला 150 पर्यंत नेऊन ठेवले. डावाच्या 31व्या षटकांत केली (61) बाद झाला. कर्णधार मेंडिसने यानंतरही श्रीलंकेचे आव्हान राखले होते. पण, शर्माने मेंडिस आणि क्रिशन अराचिगे यांना बाद करून श्रीलंकेला 41 षटकांत 5 बाद 201 असे अडचणीत आणले. त्या वेळी चहर याने श्रीलंकेच्या आव्हानातील हवा काढून घेताना त्यांची अवस्था 9 बाद 225 अशी केली. त्याने 22 धावांत 3 गडी बाद केले.

हिमांशू राणा सर्वोत्तम खेळाडू
त्यापूर्वी हिमांशु राणा आणि शुभम गिल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 8 बाद 273 धावांची मजल मारली होती. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली. राणाने 71 चेंडूंत 79, तर गिलने 90 चेंडूत 70 धावा केल्या. शेवटी कमलेश नागरकोटीच्या 14 चेंडूतल्या 23 धावांच्या खेळीने भारताचे आव्हान भक्कम झाले. सामन्यात निर्णायक अष्टपैलू खेळी करणारा भारताचा कर्णधार अभिषेक शर्माला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. तर स्पर्धेत जबरदस्त फटकेबाजी केलेल्या हिमांशू राणाला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. तसेच सर्वोत्कृष्ट एकदिवसीय युवा पदार्पण पुरस्कारासाठी राहुल चहर, कमलेश नागरकोटी आणि हेत पटेल या भारतीयांची निवड करण्यात आली.