काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची कर्नाटकात टीका
बेंगळुरू : केंद्रातील मोदी सरकार हे रा. स्व. संघ चालवत आहे, प्रत्येक मंत्रालय आणि विभागात आरएसएसची लोक असल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी मंगळवारी केला. कर्नाटक विधानसभा निवडणुक प्रचारासाठी चार दिवसांपासून राहुल गांधी कर्नाटकाच्या दौर्यावर आहेत. याप्रचार दौर्यात त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली.
सचिवांच्या नियुक्त्याही आरएसएस करते
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर आहे. काँग्रेस सत्ता राखण्याचा प्रयत्न करत असून, भाजप कर्नाटकमध्ये सत्ता मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. कर्नाटक येथील प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राहुल गांधी यांनी मंगळवारी बिजनेस लीडर्स आणि प्रोफेशनल्सशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी संघ आणि भाजप सरकारवर टीका केली. ते म्हणाले, सद्या मोदी सरकार संघ चालवत आहे. मंत्रालयातील प्रत्येक विभागात त्यांचे लोक आहेत. सचिवपदाची नियुक्तीही आरएसएस करत आहे.
कठीण जीएसटीमधून मुक्तता करु
राहुल गांधी म्हणाले, नीती आयोगामध्येही आरएसएसचे लोक आहेत. भाजपचा भारतातील प्रत्येक संस्था बळकावण्याचा प्रयत्न आहे. भारताची विदेशनीतीही त्यामुळेच खराब होत आहे. चीन आपल्या शेजारील सर्व देशांवर आपला धाक जमवून बसला आहे आणि भारत एकटाच पडला आहे. 2019 मध्ये जर आम्ही सत्तेत आलो तर या किचकट आणि कठीण जीएसटीमधून मुक्तता करु. तसेच टॅक्स स्लॅब आणखी कमी करु. नोटाबंदीही आरबीआयची नसून आरएसएसची असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. भाजप हा खोटे बोलणार्या मंडळींचा पक्ष असून, त्यांच्याकडून तुम्ही सत्याची अपेक्षा ठेवूच शकत नाही. त्यांची सर्व आश्वासने खोटी ठरली आहेत, असे खासदार राहुल गांधी म्हणाले. गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेऊन कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर टीका केली होती. त्याचा थेट उल्लेख न करताच, सिद्धरामय्या सरकारने राबवलेल्या अनेक विकास कामे व योजनांविषयी बोलताना राहुल गांधी यांनी भाजपने दिलेली आश्वासने कशी खोटी ठरली, हे सांगितले.