मुंबई – महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी काढलेल्या संघर्षयात्रेचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस समाचार घेतला आहे. संघर्षयात्रेच्या माध्यमातून सरकारविरोधी वातावरण तापवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यात्रेवरून विरोधकांना टोला लगावला आहे. संघर्ष नाव ठेवून संघर्ष यात्रा होत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
कर्जमाफीच्या मुद्द्यावर सत्ताधारी भाजपच्या विरोधात वातावरणनिर्मिती करण्याकरता काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, जनता दल (से), समाजवादी पार्टी, पीपल्स रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट), एमआयएम या सर्व विरोधकांनी चंद्रपूर ते पनवेल अशी संघर्षयात्रा आयोजित केली आहे. आज पनवेलमध्ये या यात्रेचा समारोप झाला. चंद्रपूरमध्ये यात्रेला सुरुवात करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते लक्झरी एसी बसमधून गेले होते. त्यामुळे शेतकर्यांच्या संघर्ष यात्रेत नेत्यांचा शाही प्रवास सुरू असल्याची चर्चा सुरू होती. हा मुद्दा हेरत देवेंद्र फडणवीस यांनीदेखील विरोधकांवर टीकास्त्र सोडले. संघर्ष नाव ठेवून संघर्ष यात्रा होत नाही. संघर्ष यात्रेत विरोधक लक्झरी बस आणि कारमधून रस्त्यावर उतरत नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला.
दरम्यान, विरोधकांच्या संघर्ष यात्रेचे मंगळवारी पुण्यात आगमन झाले. सत्तेत आल्यापासून या सरकारने उद्योगपतींची कर्जे माफ केली. मात्र, हेच सरकार शेतकर्यांची कर्जे माफ करण्यास तयार नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. बाजार समिती येथील निसर्ग मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे बोलत होते. तीन वर्षांत शेतकर्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. त्या रोखण्यासाठी हे सरकार कोणत्याही उपाययोजना करताना दिसत नाही, असा आरोपही तटकरे यांनी केला.