संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कापण्याचा बेस्टचा निर्णय

0

मुंबई : बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी पगारवाढीसाठी ९ दिवस संप केला होता. या संपात सहभागी झालेल्या सुमारे ११,००० बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा ९ दिवसांचा पगार कापण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान यातील शिवसेनेच्या कामगार युनियनचे सदस्य असलेल्या कर्मचाऱ्यांना मात्र याचा फटका बसणार नाही.

कर्मचाऱ्यांनी पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी ९ दिवस संप केल्यामुळे बेस्टच कोट्यावधींचं नुकसान झालं आहे. हे नुकसान लक्षात घेऊन हजारो बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साधारण साडे चार हजार ते दहा हजारापर्यंत पगार कपात होण्याची शक्यता आहे. दरम्यान शिवसेनेच्या युनियन सदस्यांनी संप संपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे त्यांची मात्र पगार कपात होणार नाही.

कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात होऊ नये यासाठी बेस्ट कर्मचारी युनियनचे अध्यक्ष शशांक राव मुख्य व्यवस्थापांकशी चर्चा करणार आहेत. संपाचे नऊ दिवस कर्मचाऱ्यांना पगारी रजा देण्यात यावी अशी मागणी शशांक राव करणार आहेत.